शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. न्यायालयाने स्थगिती दिली असताना हे काम केले जात आहे, असा आरोप शेतकऱयांनी केला आहे. याचबरोबर शेतकऱयांचे वकील लवकरच अवमान याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असतानादेखील अजूनही या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत.
हलगा-मच्छे बायपासचा रस्ता करण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्न करत आहे. मात्र चुकीचे नोटिफीकेशन करून शेतकऱयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेऊन आपली बाजू मांडली. न्यायालयाने स्थगिती देऊनही गेल्या आठ दिवसांपासून मच्छेकडून हा रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मच्छे ते येळ्ळूर रस्त्यापर्यंत सपाटीकरण केले आहे. पिकांतून हा रस्ता केला जात असल्यामुळे शेतकऱयांतून संताप व्यक्त होत आहे. आता येळ्ळूर रस्त्यापासून वडगाव, शहापूर, जुने बेळगाव शिवारातून रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र शेतकरी त्याला विरोध करणार आहेत. हा रस्ता जरी काही प्रमाणात केला तरी आम्ही अवमान याचिका दाखल करणार असल्याचे शेतकऱयांनी सांगितले. रस्त्यावरील लढाईसह न्यायालयीन लढाईही लढण्याचा निर्धार शेतकऱयांनी पुन्हा केला आहे.