बटाटा, रताळी, भुईमूग, सोयाबीन काढणीत शेतकरी मग्न : काढणी झालेल्या शिवारात ज्वारी-मका पेरणीची लगबग
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाने उसंत घेतल्याने बळीराजा शेती कामाकडे वळला आहे. विशेषतः खरीप हंगामातील बटाटा, भुईमूग, रताळी आणि सोयाबीन काढणीत मग्न झाल्याचे दिसत आहे. काही भागात बटाटा, रताळी काढणीला प्रारंभ झाला असला तरी अद्याप काही भागात काढणीला सुरुवात झाली नाही. काढणी झालेल्या शिवारात ज्वारी आणि मका पेरणीची लगबग देखील सुरू आहे. मात्र, शुक्रवारी दुपारनंतर वादळी वारा आणि गडगडाटासह पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने काढणी कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
विशेषतः लाल माती आणि माळरानावर बटाटा, भुईमूग आणि रताळय़ांची लागवड केली जाते. अलीकडच्या काही वर्षात बटाटा लागवड घटली आहे. त्यामुळे उत्पादनही कमी झाले आहे. अतिपावसामुळे लागवड झालेला बटाटा खराब झाला आहे. त्यामुळे यंदा उत्पादनातही मोठी घट झाली आहे. आधीच कमी झालेली लागवड आणि त्यातच पावसाच्या परिणामामुळे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात बटाटा आवक कमी पहायला मिळत आहे.
बटाटा लागवड क्षेत्रात घट
कुदेमनी, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, कल्लेहोळ, तुरमुरी, अतिवाड, बसुर्ते, कडोली, अगसगे, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, मण्णिकेरी, कुरीहाळ, बोडकेनहट्टी, हंदिगनूर, बंबरगे, आदी भागात बटाटा, भुईमूग आणि रताळी काढणीला प्रारंभ झाला आहे. यंदा बटाटा लागवडीचे क्षेत्र घटले असले तरी रताळी लागवड क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे यंदा रताळी उत्पादनात उच्चांकी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
रताळी दरात घट
मागील आठवडय़ात रताळय़ांना 1800 रुपये क्विंटल दर मिळाला होता. मात्र आता दरात घट झाली आहे. रताळय़ांना अधिक दर मिळत असल्याने रताळी काढणीला वेग आला होता. मात्र गुरुवारपासून रताळी दर घटल्याने रताळी काढणी पुन्हा थंडावली आहे.