महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्यावर त्यांनी या मंत्रालयाचा आपल्याला अनुभव असून त्याचा उपयोग महाराष्ट्रातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर काम करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
आपल्या एका व्हिडिओद्वारे माध्यमांशी संबाद साधताना ते म्हणाले कि, “मला वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा चांगला अनुभव आहे. मेडिकल कॉलेज असलेल्या हॉस्पिटलचा समावेश या विभागात येतो. अशा हॉस्पिटलमध्ये गरीब माणसाला विनासायास, मोफत उपचार कसे होतील हे पाहणार आहे. शासकिय मेडिकल कॉलेजच्या सुविधा वाढणार असून जनतेला खाजगी रुग्णालयाची आठवण येणार नाही यासाठी काम करत राहणार. या विभागाचा कार्यभार समजून घेऊन अडचणी सोडवून निधीसाठीही विशेष प्रयत्न करणार आहे. ‘विशेष साहाय्य’च्या कामाचाही मला अनुभव आहे.” असे म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी “राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. काहींची खाती काढून घ्यावी लागली आहेत. लोकांसाठी काम करायचं असेल तर कोणत्याही खात्यात काम करता येतं. महाविकास आघाडीच्या काळात अजितदादाकडून कोणत्याही आमदारावर अन्याय झाला नव्हता. आम्ही हे पटवून देऊ. सगळ्यांना एकत्र घेऊन काम करू हे अजितदादांनी सुद्धा स्पष्ट केलयं. सरकारमधील तीनही पक्षांची मिळून एक समन्वय समिती आहे. आमदारांना कसा निधी द्यायचा हे समन्वय समितीत ठरणार आहे. जर कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मला संधी मिळाली तर नक्कीच काम करेन.” असेही त्यांनी म्हटले आहे.