नीलेश परब / न्हावेली
सिंधुदुर्गातील गावागावांत गणेश कार्यशाळांमध्ये गणेश मूर्ती बनवण्यासाठी मुर्तीकारांचे हात वेगाने सुरू आहेत. रंग माती आणि मजुरी अशा गोष्टींवर तब्बल 20 टक्के रक्कम वाढली असली तरी आणि पर्यायाने कोकणात आणि सिंधुदुर्ग गणेश चतुर्थी धुमधडाक्यात साजरी होणार आहे गणेश मूर्तीवरील बऱ्याच घरगुती गणपतीसह विशेषता सार्वजनिक गणेश मंडळाने उंच मूर्ती करण्याकडे भर दिला आहे मात्र महागाई वाढली असली तरी येथील भक्तगणांनी त्याला सुद्धा पसंती दर्शवत हा सण उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणातील गावागावांत गणेश कार्यशाळांमध्ये गणेश मूर्ती बनवण्यासाठी मुर्तीकारांचे हात वेगाने सुरू आहेत.गणेश मूर्ती बनवणं ही एक कला आहे. ही कला मातीतून तयार करावी लागते. जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं गावागावांत मिळणारी चिकट माती, शाडू माती आणि आता लाल माती यांपासून गणेशाची मूर्ती घडवल्या जात आहेत. मात्र आता तयार पिओपीच्या मुर्ती कोकणातील वाड्या वस्त्यांवर येऊ लागल्यानं या क्षेत्रात 10 टक्के कला शिल्ल्क राहिली असून 90 टक्के व्यापार झाला आहे. आता कोणीही उठतो आणि लगेच व्यापारी बनतो. खरा कलाकार मात्र उपेक्षितच राहू लागला आहे. तर पिओपीच्या मुर्तींचं विघटन होत नाही. मूर्ती विसर्जन केल्यानंतर विटंबना होते. तसेच पिओपीच्या मुर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण देखील होतं. त्यामुळे पिओपीला लाल माती हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागलेले असून दिवसरात्र गावागावातील गणेशशाळा गजबजू लागल्या आहेत. पिढ्यानपिढ्या गणेशमूर्ती घडविणारे मूर्तीकार आता गणरायाच्या मूर्तीच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. जिल्ह्यात परंपरागत गणेशमूर्ती घडविणारे अनेक कलाकार आहेत. आपली पिढीजात कला आजही टिकवून ठेवलेली आहे. ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी चांगले मूर्तिकार यानिमित्तानं असल्याचं दिसून येत आहेत. आपल्या कुंचल्यातून सुंदर गणेशमूर्ती घडविण्याचं काम अनेक वर्षे करताना दिसतात. केवळ एक कला, मानसिक समाधान आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला जोपासली गेली पाहिजे, यासाठीच ही परंपरागत कला चालू आहे. आपण व्यवसाय म्हणून याकडे न पाहता कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेनं हा व्यवसाय करत असल्याचं ग्रामीण भागातील अनेक मूर्तिकार सांगतात. घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक गणेश मूर्तिकारांकडे किमान 100 ते 200 विविध आकारातल्या मातीच्या गणेशमूर्ती असतात. या गणेशोत्सवाची चाहूल किमान दोन महिने पूर्वीपासून लागते.
कोकणात प्रामुख्यानं चिकट माती जी गावागावांत मिळते त्यापासून गणेशमूर्ती घडवल्या जातात. मात्र आता शाडू मातीच्या देखील मूर्ती मोठ्या प्रमाणावर घडविल्या जात आहेत. तळकोकणात यावर्षी कर्नाटकमधून लाल माती आणून वजनाला हलक्या मुर्त्या आणि दिसायला सुबक मुर्त्या बनवल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली येथील मूर्तिकार रविराज चिपकर यांनी हा प्रयोग केला आहे. या लाल मातीच्या मूर्ती पिओपीच्या मूर्तींना पर्याय ठरू शकतात. तसेच या मूर्तींचं विघटनसुध्दा लवकर होऊन पर्यावरण पूरक मूर्ती घडवल्या जात आहेत. तसेच कोकणात कागदाच्या लगद्यापासूनही गणेशमूर्ती बनविल्या जातात. पर्यावरणप्रेमी तर वर्षानुवर्ष अशाचप्रकारच्या गणेशमूर्ती आणतात.
गणेशमूर्ती साकारताना मूर्तीकारांचं कसब लागतं. त्यात त्यांची जबाबदारी वाढलेली असते. कोकणातल्या या गणेशोत्सवासाठी विविध ठिकाणचे चाकरमानी आवर्जून येतात. दरवर्षी माती, रंगाचे वाढलेले दर शिवाय कामगारांची वाढलेली मजुरी आणि गणेशमूर्तींमधून मिळणारी रक्कम याचा मेळच बसत नसल्याचंही मूर्तीकार सांगतात. एक गणपतीची मूर्ती तयार व्हायला पंचवीस कलाकांराचे हात राबत असतात. यात मूळ शिल्प घडवणारे, त्याचे साचे पाडणारे, मूर्ती करणारे, रंगकाम करणारे, डोळ्यांची आखणी करणारे अशा कारागिरांसोबतच मूर्तींना पॉलिश करणं, साधा रंग लावणं यापासून ते गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवणं याची लगबग सध्या जिल्ह्यात गावागावांत पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्गात यंदा मोठ्या गणेशमूर्तींना मागणी अधिक आहे.यावर्षी गणेशमूर्तीना महागाईची झळ बसणार आहे. शाडू मातीच्या किंमतीत झालेली वाढ,वाढलेली मजुरी, रंगकामाचे वाढलेले दर यामुळे गणेशमूर्तींच्या किंमती फुटा मागे ५०० रुपयाने वाढल्या आहेत.यावर्षी 19 सप्टेंबरला गणरायांचे घरोघरी आगमन होणार आहे.तर यंदा गणेशमूर्ती रेखाटणाऱ्या कलाकारांचे मजुरीचे दरही वाढले आहेत. गणेशमूर्ती शाळेत काम करणाऱ्या मजुरांना गतवर्षी दररोज ५०० रुपये रोजंदारी द्यावी लागत होती. यावर्षी ही मजुरी ६०० ते ७०० रूपयांपर्यंत पोहोचली आहे. रोजंदारीसह साहित्याच्या खर्चात वाढ झाली असून त्यातच इंधनाचे दरही वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे.
शाडूची मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती अन्य राज्यातून येत असल्याने किंमत वाढते. ही माती अनेकदा वेळेवर उपलब्ध होत नाही. शाडूची मूर्ती वाळण्यासाठी दहा दिवस लागत असल्याने खर्चाचेही प्रमाण वाढते. याउलट पीओपीची मूर्ती एका दिवसात वाळत असल्याने रंगरंगोटी त्वरित करता येते. या मूर्तीचे उत्पादन लवकर व मोठ्या प्रमाणात करता येते. या मूर्ती शाडूच्या मूर्तीच्या तुलनेत स्वस्त असतात.मात्र गावठी माती असो व शाडूची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते. त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्यामुळे मातीपासून गणपती तयार करण्यात येत आहेत.तर मातीच्या मुर्त्यांकडे यावर्षी लोकांचा कल दिसून येत आहे.
यंदा कोकणात प्रचंड मागणी असली तरी अवघ्या एका महिन्यावर गणेशोत्सव आल्याने कारागिरांना मागणी तसा पुरवठा करताना तारांबळ उडत आहे. कमी कालावधीत जादा मूर्ती करण्याला मर्यादा येऊ लागल्या आहेत.तर पावसाचा अंदाज अजूनही सांगता येत नाही. उंचीबाबतचे निर्बंध उठवले असले तरी मूर्तिकाम करणाऱ्या कारागिरांनी मोठ्या मूर्तींचे बुकिंग अद्यापही घेतलेले नाही. यंदा मूर्तिकारांकडे पाच ते सहा फूट उंचीच्या मूर्तींना मोठी मागणी असल्याने सर्वच शाळांमध्ये कामांना वेग आला आहे.मागील वर्षी कोरोनामुळे मोठ्या गणपती मूर्तीची मागणी कमी होती त्यामुळे भावही कमी होते. यंदा मागणी वाढली असून महागाईनं मूर्तीच्या किंमतीही वाढल्या असल्याचे मूर्तिकार सांगतात.