काल 3.70 इंच पावसाची नोंद तर गेल्या महिन्याभरात सरासरी 70 इंच, मौसमातील एकूण पाऊस 80 इंच,
विशेष प्रतिनिधी / पणजी
राज्यात सुरू असलेल्या पावसाने रौद्रावतार धारण केला आहे. संपूर्ण महिनाभरात 70 इंच पाऊस पडला तर शनिवारी सरासरी 3.70 इंच एवढी पावसाची नोंद झाल्याने मौसमातील पाऊस 80 इंच झालेला आहे. शनिवारी राज्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपल्याने सर्व नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पावासाचा जोर असाच राहिला तर आज उद्या सर्वत्र महापूर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तिळारीमधून अत्यल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू झाल्याने शापोराचे पाणी किंचित प्रमाणात पात्राबाहेर पोहोचले आहे. तिळारी परिसरात मुसळधार पाऊस झाल्यास सर्व गेट्स खुल्या कराव्या लागणार असल्याने धोक्याचा इशारा कायम आहे. सत्तरीत सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर हवामान खात्याने पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
गोव्यात मुसळधार पावसाचे थैमान चालूच असून पुढील चार दिवस जोरदार पाऊस कोसळणार, असा इशारा देत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेले काही दिवस दररोज किमान 3 ते 4 इंच पाऊस पडत आहे. दि. 23 जूनपासून खऱ्या अर्थाने सुरू झालेल्या पावसाने शनिवारी 22 जुलैपर्यंत एका महिन्याभरात 70 इंचाचे उद्दिष्ट पूर्ण केले. दिवसाकाठी जवळपास 2.50 इंच या सरासरीने पाऊस पडलेला आहे.
शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र सायंकाळी 6 पर्यंत तुफान पावसाने अर्धातास उत्तर गोव्यात अनेक भागात झोडपून काढले. आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे सध्या मुंबईला असून ते मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्या सातत्याने संपर्कात असून सत्तरीतील पूर परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करीत राहिले आहे. मामलेदार व उपजिल्हाधिकारी वाळपई यांनाही आरोग्यमंत्र्यांनी सारी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सत्तरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि सर्व नद्यांची पातळी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हादई नदीमुळे आलेल्या महाप्रलयासारखी अवस्था पुन्हा निर्माण होऊ नये. यासाठी सर्व आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सांखळीच्या वाळवंटी नदीचे पात्र धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचले होते. विर्डी आणि इतर डोंगर परिसरातील पावसाचा जोर सायंकाळी कमी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली नाही. मात्र पावसाचा जोर वाढला तर सांखळी, पर्ये. केरी आदी भागात पूर येण्याची भाती निर्माण झालेली आहे.
अणजुणे धरण भरण्यास 8 मीटर शिल्लक
अणजुणे धरण परिसरात पावसाची तुफान वृष्टी चालू असून गेल्या 10 तासांत धरणमध्ये पावणे दोन मीटर्सनी पाण्याची आवक वाढली आहे. धरणावर सध्या 85.3 मीटर एवढा पाण्याचा साठा वाढला आहे. धरणाची क्षमता 93 मीटर्स आहे. 91 मीटरपर्यंत पाणीसाठा झाला की धरणाची द्वारे खुली करावी लागतात. पावसाचा जोर असाच राहिला तर पुढील दोन दिवसांनी धरण फुल्ल होईल आणि दारे खुली करावी लागतील. त्यातून वाळवंटीच्या पात्रात अतिरिक्त पाणी पोहोचेल व पुराची शक्यता वाढणार आहे.
तिळारीची द्वारे खुली, पुराचा धोका वाढला
दरम्यान, तिळारीमध्ये पाण्याची आवक अतिवेगाने वाढत असल्याने शनिवारी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे दरवाजे खोलण्यास प्रारंभ झाला. यामुळे शापोरा नदी अगोदरच दुथडी भरून वाहत होती. आता तिळारीच्या अतिरिक्त पाण्यामुळे शापोरा नदीचा प्रवाह पात्राबाहेर पडला व अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. साळ, पीर्ण, कोलवाळ, धारगळ इत्यादी सखल भागात पुराचे पाणी पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सांखळीत पुन्हा 7 इंच नोंद
उत्तर गोव्यात गेल्या 24 तासांत 5 ंइंच तर दक्षिण गोव्यात सरासरी 2.5 इंच पाऊस पडला. यामुळे राज्यात सरासरी 3.5 इंच पावसाची नोंद झाली. मौसमातील एकंदर पाऊस 70 इंच झालेला आहे. सरासरीपेक्षा 18 इंच पाऊस पडलेला आहे. 24 तासांत गोव्यात सर्वाधिक 7 इंच पाऊस सांखळीत पडला. म्हापसा व पेडणे येथे प्रत्येकी 5.50 इंच, फोंडा येथे 3.50 इंच, पणजी 4 इंच, जुने गोवे 4.25 इंच, काणकोण 4 इंच, दाबोळी, मडगाव येथे प्रत्येकी 2 इंच, केपे, सांगे येथे प्रत्येकी 2.50 इंच, तर मुरगावात 2.25 इंच पावसाची नोंद झाली. यंदा सरासरीपेक्षा 20 टक्के जादा पाऊस झाला.