अध्याय चोविसावा
त्रैलोक्मयाच्या पलीकडे असलेल्या लोकांबद्दल भगवंतांनी उद्धवाला माहिती दिली. ते म्हणाले, उद्धवा सत्यलोकापर्यंत ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीचा पसारा आहे. त्याहीपलीकडे कैलास व वैकुंठलोक आहेत. कैलासलोक हा महादेवांच्या लिलेतून तयार झाला असून वैकुंठालोकाची निर्मिती ही विष्णूची लीला आहे. ही सर्व माहिती ऐकून माणसाने कोणते कर्म केले की, कोणता लोक प्राप्त होतो हे समजले तर बरे होईल असे उद्धवाला वाटले.
त्याचे मनोगत जाणून भगवंत पुढे सांगू लागले, सत्यलोक आणि ज्याची रचना आश्चर्यकारक आहे असे वैकुंठ! यांची प्राप्ती करून घेण्यासाठी साधकांचे प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी ते योग, तपश्चर्या आणि संन्यास अशी साधने करत असतात. त्यातून त्यांना महर्लोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोक अशा उत्तम गती प्राप्त होतात पण जो माझी अनन्य भक्ती करतो त्याला सरळ सरळ माझे परम धाम प्राप्त होते. हे सगळय़ात गुह्यतम ज्ञान आहे. जो मुळासह सर्व संकल्पांचाच संन्यास करतो, त्याला लोकांतराला जाणे घडत नाही. तो मुक्तच होतो. हे ज्याला घडत नाही आणि जे विधियुक्त संन्यासी असतात, जे अंतःकरणापासून अत्यंत विरक्त असतात, स्वप्नातसुद्धा सोन्यारुप्याला हात लावीत नाहीत.
जे सदासर्वकाळ संन्यासधर्मात निमग्न असतात आणि जे निरंतर ओंकाराचा जप करतात, जे आश्रमविधी पत्करल्यानंतर त्याचा कंटाळा मानत नाहीत. मरणसमयी ज्याची बुद्धी चंचल होत नाही, त्याचे सत्यलोकात जाणे घडते. सत्यलोकात गेलेल्यापैकी ज्यांना तेथल्या सुखविलासादि भोगांचीही विरक्ती असते, ते ब्रह्मदेवाबरोबरच मुक्त होतात आणि बाकीचे परत येतात. ज्यांना सत्यलोकातील भोगविलास भोगण्याचीच आवड असते, तेही तेथून माघारे पाठवले जातात, मग इतर लोकांची गती काय सांगावी? त्यांना जन्म आणि मरण सोडतच नाही.
भोगासक्ती म्हणून जेथपर्यंत आहे, तेथपर्यंत हा पुनरावृत्तीचा फेरा आहेच. पण जेथे भोगाचीच इच्छा नाहीशी होते, तेथे चारही मुक्ती दासी होऊन राहतात. ज्या लोकात ज्यांना भोगविरक्ती होते, तेथून ते पुढे जातात आणि ज्या लोकात ज्यांना भोगासक्ती उत्पन्न होते, तेथून ते खचून भूलोकावर पडतात परंतु माझी भक्ती मात्र तशी नव्हे. जे माझी भक्ती करतात त्या माझ्या भक्तांना दुसऱया कशाचीच प्राप्ती होत नाही.
उद्धवा! माझ्या भक्तांना निश्चयाने माझीच गती प्राप्त होते. जे इच्छा धरून माझी सेवा करतात, त्यांना वासनेच्या फळातच रहावे लागते परंतु ज्यांना माझी निष्काम भक्ती प्रिय असते, त्यांना माझी अनन्य प्राप्ती होते. सकाम भक्तांच्या वासना पूर्ण करून, त्यांना मी नेहमी निष्काम करीत असतो. मी पुरुषोत्तम, माझ्या भक्तांना निजधामाला घेऊन जातो. उद्धवा! म्हणूनच गोपींची कामासक्ती होती, ती मीच निष्काम स्थितीला आणून त्यांना सायुज्यमुक्ती दिली हे लक्षात ठेव. मी गोपिकांशी कामविलास केले की, त्यांचा काम पूर्णपणे नष्ट केला, या म्हणण्याचा विचार न करताच मूर्ख लोक कृष्णाने व्यभिचार केला असे म्हणतात.
भक्तांना सलोकता आवडत असेल तर मी त्यांना वैकुंठात राहावयास घेऊन जातो. भक्ताने समीपता मागितली, तर मी त्याला आपला जिवलग मित्र करतो. कशाला म्हणशील तर मनीचे हितगुज सांगायला, मनातील गोडगोड गोष्टी बोलायला! उद्धवा! तू मला जसा आवडतोस, त्याचप्रमाणे मी त्याच्यावर प्रीती करतो.
भक्ताने सरूपता मागितली तर त्याला मी चतुर्भुज करतो आणि शंख-चक्रादिक आयुधे त्याला देऊन मेघाप्रमाणे सुंदर सांवळा वर्ण देतो. मुकुट, कुंडले, मेखळा, नेसावयाला पिवळा सोनसळा पीतांबर, वाकी, पायात तोडर आणि गळय़ामध्ये माझ्यासारखाच कौस्तुभमणि. आकारस्वरूप, गुणलक्षण, वीर्य, शौर्य, पूर्ण गांभीर्य, रूपलक्षणे ही अगदी सारखी. दोघेही स्वरूपाने अगदी एकसारखेच असतो.
क्रमशः