अध्याय विसावा
या अध्यायाच्या सुरवातीला भगवंतांनी सांगितलं की, उद्धवा सर्वकाही ब्रह्मव्याप्त असल्याने, समोर दिसणारा संसार निखालस खोटा आहे तेव्हा अस्तित्वच नसलेल्या गोष्टीत गुणदोष कुठुन येणार? तेव्हा त्या भानग
डीत तू पडू नकोस. त्यावर उद्धव म्हणाला, देवा गुणदोषांबद्दल तुम्हीच वेदात सांगितलंय आणि आता म्हणताय गुणदोषाकडे बघू नकोस! मला तुमच्या बोलण्याची संगती लागत नाही. मला कृपया सर्व उलगडून सांगा. त्यावर भगवंत म्हणाले मी जरूर गुणदोषांबद्दल वेदात सांगितलंय पण ते अशासाठीच की, माणसाने गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा व दोष टाकून द्यायची तयारी करावी.
आता पुढे ऐक, जे विधिपूर्वक व संकल्पयुक्त संन्यास घेऊन कर्माचा त्याग करतात, त्यांच्याकरिता मी ‘ज्ञानयोग’ प्रकट केला आहे. आता ह्या लोकात जे केवळ अविरक्त असतात, त्यांच्यासाठी मी कर्मयोग प्रगट केला आहे. उत्कृष्ट व अलौकिक असा तिसरा एक अधिकारी आहे, तोही ऐक. जो मनुष्य अत्यंत विरक्तही नाही आणि अतिशय आसक्तही नाही, तसेच ज्याला पूर्वपुण्याईमुळे माझ्या कथा इत्यादीमध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते, त्याला भक्तीयोगाने सिद्धी प्राप्त होते.
तो जे जे श्रवण करतो, त्याचे अनुसंधान त्याच्या हृदयात चालत असते. त्यामुळे मननही उत्साहयुक्त प्रेमाने होऊ लागते. त्यायोगे विषय हे दोषयुक्त असल्याचे दिसतात. ह्याप्रमाणे विषयात असलेले दोष तो निरंतर पाहात असतो पण ते पूर्णपणे टाकून देण्याचेही सामर्थ्य त्याच्या अंगात नसते पण विषय भोगीत असताना तो कंटाळलेला असतो. ह्याप्रमाणे जो अशा मधल्या स्थितीतला असेल, त्याच्याकरिताच मी वेदमुखाने भक्तिमार्ग दाखवून दिला आहे. विषयोपभोगाविषयी जेव्हा मनाला किळस उत्पन्न होते तेव्हा कर्माचा विचार समूळ बंद पडतो किंवा दैवयोगाने अंतःकरणांत उल्हास उत्पन्न होऊन माझी कथा ऐकण्याविषयी अत्यंत आदर उत्पन्न होतो तेव्हाही कर्ममार्ग संपतो. माझी कथा श्रवण करीत असता प्रेमाने अंतःकरण उचंबळून येते, घरादाराची आठवण बुजून जाते, तेव्हा कर्मत्यागाचा दोष बाधत नाही. माझी कथा श्रवण करीत असता कोटय़वधी कर्माचा लोप होऊन गेला तरी, कर्मलोपाचा दोष बाधत नाही. एवढा माझ्या कथेचा प्रभाव आहे.
माझी प्रेमपुरस्सर भक्ती करीत असता जेव्हा माझ्या भक्तांकडून नित्यकर्मे व्हायची राहतात, तेव्हा ती त्यांची कर्मे तेहतीस कोटी ऋषि महंत पूर्ण करीत असतात. एवढा माझ्या कथेचा महिमा आहे. माझे पूजन व कीर्तन चालू असता तेथे विघ्नांची येण्याची बिशाद काय? समोर तोंडसुद्धा दाखविण्याचे त्यांना सामर्थ्य होत नाही किंवा एखादा पुरुष पूर्ण विरक्त झाला, अथवा माझ्या सेवेत तत्पर होऊन राहिला, तर त्याच्या ठिकाणी कर्म बिचारे दास बनून राहते. स्वधर्मानुरूप कर्मे केली असता माझी प्राप्ती होते. तेही मी तुला यथार्थ रीतीने सांगतो ऐक. उद्धवा! आपापल्या वर्णाश्रमधर्मानुसार फळाची आशा न करता यज्ञादी सत्कर्मे केली आणि निषिद्ध कर्मे केली नाहीत, तर त्याला स्वर्गनरकात जावे लागत नाही. गृहस्थाश्रमामध्ये स्वधर्मानुरूपच राहिले, अन्य मार्गाने चालले नाही, तर येथेच नक्की विरक्ति प्राप्त होते. आता अन्य मार्गाचरण म्हणजे काय, असे विचारशील तर त्याचेही साद्यन्त लक्षण
सांगतो.
परद्रव्य आणि परदारा ह्यांचा अभिलाष व परनिंदेचा हव्यास, यालाच उध्दवा! ‘नरकाचा मार्ग’ म्हणतात. स्वर्गातील सुख ऐकून तेच पाहिजे म्हणून ज्याचे मन हट्ट करते आणि जो तदनुकूल कर्मे करितो, त्याला अचूक स्वर्गभोग प्राप्त होतो. नरकगती किंवा स्वर्गप्राप्ती ह्या दोन्ही ‘अन्यगती’ म्हणजे विपरीत स्थिती आहेत. हे वेळीच ओळखून यातून वृत्ती काढून यज्ञादिक कर्मानी माझे यजन केले असता, नित्यनैमित्तिक कर्मानीच वैराग्यस्थिती म्हणजे नैराश्य प्राप्त होते त्यामुळे स्वर्गामध्ये वस्ती करावी लागत नाही किंवा नरकातही जावे लागत नाही. इहलोकीच विरक्तता प्राप्त होते.
क्रमशः