दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना : 11 लाख चौ. मी. जमिनीचे होणार संपादन
मडगाव : सांगे तालुक्यातील रिवण गावामध्ये आयआयटी प्रकल्प साकारणार हे आता जवळपास नक्की झालेले आहे. रिवण गावातील सुमारे 11 लाख चौ. मी. जमीन संपादन करण्यासाठी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी अधिसूचना जारी केली आहे. सांगे मतदारसंघात आयआयटी प्रकल्प व्हावा यासाठी सुरूवातीपासून समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी कंबर कसली असून त्यांच्या प्रयत्नांना देखील त्यामुळे यश मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जागेवरून वादात सापडलेला आयआयटी प्रकल्प अखेर सांगे तालुक्मयातील रिवण परिसरातच उभारण्यात येणार, हे निश्चित झाले आहे. आयआयटी प्रकल्पासाठी रिवण-सांगे येथील सर्व्हे क्रमांक 168/1 मधील 6,27,703 चौरस मीटर, सर्व्हे क्रमांक 169/1 मधील 3,79,500 चौरस मीटर, सर्व्हे क्रमांक 169/2 मधील 11,315 चौरस मीटर, तसेच रिवणमधील सर्व्हे क्रमांक 169/3 मधील 33,100 चौरस मीटर जमीन (भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मधील सार्वजनिक उद्देशांसाठी) ताब्यात घेणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
दोन्ही पंचायतींची हरकत नाही : फळदेसाई
ही जमीन नियोजित आयआयटी प्रकल्प तसेच इतर पायाभूत सुविधांसाठी संपादित करण्यात येण्याची शक्मयता असल्याचेही या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी आयआयटी प्रकल्प अखेर रिवण गावामध्येच प्रत्यक्षात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयआयटी प्रकल्पासाठी रिवण पंचायतीने ‘ना हरकत दाखला’ दिला आहे. तसेच हा प्रकल्प सांगे व केपे मतदारसंघाच्या सीमेवर असल्याने दोन्ही पंचायतीचे ना हरकत दाखले मिळाल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
पाठिंब्यानंतरच जारी केली अधिसूचना
आयआयटी सारखा प्रकल्प सांगे मतदारसंघात येणे भूषणावह आहे. रिवण येथील जागा नक्की करण्यापूर्वी आपण स्थानिक लोकांकडे चर्चा केली होती. त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली होती. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या. ग्रामस्थांचा पाठिंबा अगोदर मिळविला होता. त्यानंतरच अधिसूचना जारी करण्यात आल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले.
सांगे मतदारसंघाचा विकास होईल
यापूर्वी कोठार्ली-सांगे येथे आयआयटीसाठी जागा पाहिली होती. परंतु, ती जागा अपुरी पडत असल्याने कोठार्ली येथील जागा सोडून द्यावी लागली होती. आता रिवण येथील जागा नक्की झाली असून त्या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. आयआयटी आल्यास सांगे मतदारसंघाचा विकास होईल. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. हा शैक्षिणक प्रकल्प असल्याने त्याचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. विरोधासाठी विरोध असू नये, असेही फळदेसाई म्हणाले.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात आयआयटीचा वाद गाजत आहे. आयआयटी प्रथम सांगे तालुक्मयातच उभारण्याचे निश्चित झाले होते. तेथील स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केल्यानंतर हा प्रकल्प नंतर काणकोण तालुक्मयात गेला. तेथेही प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध झाल्याने प्रकल्पासाठी सत्तरी तालुक्मयातील शेळ-मेळावलीची निवड करण्यात आली. तेथेही तीव्र आंदोलन छेडले. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा सांगेतच उभारण्याचे निश्चित करून सरकारने पुढील प्रक्रिया सुरू केली होती. आता दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेमुळे आयआयटी सांगेतच होणार, हे स्पष्ट झाले आहे. गोव्यात आयआयटी प्रकल्प होऊ नये यासाठी एक बाह्या शक्ती जोरदार प्रयत्न करीत आहे. या बाह्या शक्ती स्थानिकांना भडकावून त्यांना प्रकल्पाच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करीत असते. काही झाले तरी गोव्यात आयआयटी प्रकल्प साकारू नये असेच त्यांचे प्रयत्न आहे. त्यामुळे आता रिवणमध्ये आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.