मंत्री सुदिन ढवळीकर यांचे कवळे येथे प्रतिपादन : कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणारी कवळे पंचायत पहिली
वार्ताहर /मडकई
राज्यात मलनिस्सारण एसटीपी प्रकल्प व साळगांव येथील कचरा प्रकल्प आपल्याच कारकिर्दीत माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या सहकार्याने राबविला होता. देशातील पहिला मलनिस्सारण प्रकल्प ग्रामीण भाग दुर्भाट या गावी राबवून मडकई मतदारसंघाची मान उंचावलेली आहे. कचरामुक्त मतदारसंघ करताना स्वच्छ सुंदर मतदार संघ बनवूया, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करूया. कवळे पंचायतीने कचरा मुक्त प्रकल्प राबवून या कार्यात सहकार्य केल्याबद्दल कवळे पंचायतीचे अभिनंदन जाहीर कार्यक्रमातून विजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
कवळे येथे कवळे ग्रामपंचायतीने 14 वित्त आयोगातर्फे रू. 48 लाख खर्चून उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्प व शेडचे उद्घाटन करताना मंत्री सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, सरपंच राजेश कवळेकर, निवृत्त सरकारी अधिकारी नारायण नावती, फोंडा गटविकास अधिकारी आश्विन देसाई, बांदोडा सरपंच राजेश नाईक, दुर्भाट आगापूरच्या सरपंच सरोज नाईक, उपसरपंच मनुजा नाईक, पंचसदस्य द्रुपदा नाईक, श्वेता गावडे, सोनाली तेंडूलकर, उषा नाईक, समिता नाईक, गौतम नाईक आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
कवळे पंचायतीचा विकासात कहर – मंत्री सुदिन ढवळीकर
कचरा शेडला आग लावूनही पंचायतीने कहर केला. कचरा गोळा केलाच उलटपक्षी कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवून विकास कामात सरशी दाखविली. त्यामुळे त्यांची पंचसदस्यांची कारर्किद संपली नसून ती यापूढे खरी सुरू होणार आहे. समाज उभारणीसाठी कार्यरत राहणाऱया सर्वाच्याच पाठीमागे समाज उभा असतो. अशा माणसांना निवडून देण्याचे आवाहन मंत्री ढवळीकर यांनी केले.
राजेश कवळेकर यांनी सांगितले, कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी प्रत्येक ग्रासभेत वारंवार होत असलेला विरोध पाहून प्रकल्प अन्यत्र ठिकाणी राबविण्याचे खूप प्रयत्न केले होते. गेले वर्षभर हा प्रकल्प रखडला होता. कचरा शेडला आग लावूनही पंचवीस दिवसात देवी शांतादुर्गेच्या कौलप्रसादाने त्याच ठिकाणी कचरा प्रकल्प व शेड उभारून देणे ही तिची किमया आहे. माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे रूपये 3.50 लाख खर्चून नविन शेड बांधण्यात आलेली आहे.
गोव्यातील पंचायतींपैकी कवळे पंचायत पहिली ठरली
गोव्यातील सर्व पंचायतीपैकी एवढा मोठा प्रकल्प राबविणारी कवळे ही पहिली पंचायत ठरली आहे. 3000 घरातून कचरा गोळा केला जात होता. यासाठी पंचायतीला रूपये 1.50 लाख खर्च येत होता. दिवसाकाठी पंचायत एकूण 1200 किलो कचरा गोळा करीत आहे. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर खताची निर्मिती होत असते. त्याचा योग्य वापर केला जाईल. कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवून त्यात सहा जणांना नोकऱयाही दिलेल्या आहेत. 14 वित्तआयोगातर्फे पंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी रिक्षा घेतलेली आहे. हे वाहन चालवण्यासाठी तीन ड्रायव्हर पंचायतीकडे आहे. कचरा गोळा करण्यास कधीच खंड पडत नसतो. सण उत्सवावेळी सुध्दा कचरा गोळा केला जातो. या अजोड कार्यामूळे कवळे पंचायतीचे अभिनंदन करण्यात आले.
नारायण नावती यांचेही भाषण झाले. यावेळी माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सरपंच श्री. कवळेकर यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व बटन दाबून कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन मनोज बोरकर यांनी तर मनुजा नाईक यांनी आभार मानले.