ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले. त्यानंतर अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट महाभारत, रामायण आणि पानिपत युद्धाचा दाखला देऊन भाजपावर टीकास्त्र डागले. महाराष्ट्रात पुन्हा एकदा रामायण, महाभारताची पुनरावृत्ती होणार असे जाधव यांनी सांगितले.
जाधव म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपची प्रत्येक चाल सरकार उलथवून लावण्यासाठी होती. राज्यात कोरोनासारखं संकट आलं. महाराष्ट्राची एक परंपरा आहे, विचारधारा आहे. राज्य संकटात असताना सरकार कोणाचे आहे हे पाहिलं जात नाही; तर संकटात राज्य बाहेर कसे येईल यासाठी सत्ताधारी आणि विरोधक खांद्याला खांदे लावून लढत असतात. मात्र कोरोना संकटात भाजपची प्रत्येक कृती ही विरोधातील होती. भाजपने कधी कुणाच्या हातात भोंगा दिला, तर कधी कुणाच्या हातात हनुमान चालिसा दिली. कधी नुपूर शर्मा, तर कधी सुशांतसिंह महाराष्ट्रात आणला.
भाजपने राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? तुम्ही सगळय़ांच्या मागे ईडी लावत आहात. या सगळय़ा मराठी माणसांवर ईडी लावत आहात. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे किती लोक तुम्ही पवित्र करून घेणार आहात? या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत आणि रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. एकमेकांच्या विरोधात दिल्लीच्या बादशाहसाठी लोक लढत आहेत. पण दिल्लीचा बादशाह सहिसलामत आहे. मरत आहेत ते फक्त महाराष्ट्रातील मराठी लोक, असेही जाधव म्हणाले.