पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्राला साखर उद्योगाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. यावर्षीची साखर उद्योगाची उलाढाल एक लाख आठ हजार कोटींची झाली असून, पुढच्या तीन वर्षात आपण अडीच लाख कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठू शकतो, एवढी ताकद साखर उद्योगामध्ये आहे. किंबहुना साखर उद्योगाचे जागतिक नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात ताकद आहे, असा विश्वास राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.
साखर संकुलच्या माध्यमातून साखर आयुक्त या नात्याने शेखर गायकवाड यांनी घेतलेल्या क्रांतीकारक निर्णयांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी विस्मा अर्थात वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनतर्फे शेखर गायकवाड आणि साखर संचालक उत्तम इंदलकर यांच्या विशेष कृतज्ञता सत्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ‘महाराष्ट्र राज्य साखर उद्योगाचा भविष्यवेध’ याविषयी मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मुंबईचे महाव्यवस्थापक शशी प्रकाश, विस्मा अर्थात वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, विस्माचे महासचिव पांडुरंग राऊत, विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, साखर कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि नव्या पिढीला बरोबर घेऊन समाज माध्यमांसारख्या साधनांचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. आजपर्यंत साखर उद्योगात शंभरपेक्षा जास्त इनोव्हेशन्स करण्यात आले असून भविष्यातदेखील या क्षेत्रातील बायप्रॉडक्टमुळे तरूणांना अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी साखर कारखान्यांनी आपापल्या परिसरातील एमबीए आणि एमएसडब्ल्यू झालेल्या किमान पाच तरूणांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम दिले पाहिजे.
इंदलकर म्हणाले, साखर उद्योग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा उद्योग असून सहकारी आणि खासगी असे एकूण 200 साखर कारखाने असलेले महाराष्ट्र हे या क्षेत्रातील देशामधील एक अव्वल राज्य आहे. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमध्ये एकमेकांत स्पर्धा नसून ते एकमेकांना पूरक आहेत.