कठोर कायदा अंमलात आणण्याची महिला मंचची मागणी
बेळगाव : राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. धर्मांतराचे प्रकार वाढत चालले आहेत. लव्ह जिहाद वाढत असून हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे. यासाठी राज्य सरकारने कठोर कायदे अंमलात आणावेत, अशा प्रकारांवर त्वरित आळा घालावा, अशी मागणी महिला सुरक्षा मंचतर्फे करण्यात आली. यावेळी मुनवळ्ळी येथील धर्मांतराच्या घटनेत सापडलेली महिला कावेरी हिने घटनेबाबतची सविस्तर माहिती दिली. कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. जयश्री मंद्रोळी यांनी अशी मागणी केली. नुकताच सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे विवाहित महिलेला जाळ्यात अडकवून तिचा धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मात्र याची तितक्या गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा उडाले आहेत. हुबळी येथील तरुणीची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. हाही लव्ह जिहादचा प्रकार आहे. अशा घटना वाढत चालल्यामुळे हिंदू धर्मीय मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणे कठीण झाले आहे. या विरोधात सरकारने कठोर कायदा अंमलात आणला पाहिजे. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू धर्मीय तरुणींना लक्ष्य करून धर्मांतर करण्यात येत आहे. 15 दिवसांतील ही दुसरी घटना असून राज्यात अशा घटना वाढत आहेत. यावर त्वरित प्रतिबंध घालण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अॅड. एस. आर. होळी, अॅड. रेणुका हेग्गनाईक, कल्पना तुपेकर, श्वेता जगदाळे, सीता तुपेकर आदी उपस्थित होते.