पुणे / प्रतिनिधी :
यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षांतील सर्वांत उष्ण महिना ठरला असतानाच आता मार्च महिन्यातील वातावरणही अतिउष्ण राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील तापमानाचा पाराही सध्या वाढला असून, पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानही वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्हय़ांतील कमाल तापमान सध्या 34 ते 37 अंश सेल्सिअसच्या आसपास असून, ब्रम्हपुरी येथे बुधवारी सर्वाधिक 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मागील वर्षीप्रमाणे यंदाचाही उन्हाळा कडक राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने आधीच वर्तविला आहे. फेब्रुवारीबरोबरच मार्च, एप्रिल व मे असे तीनही महिने कडक असतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याची प्रचिती पहिल्या दिवसापासूनच येत असून, मार्च महिन्याची सुरुवातही कडाक्याच्या उन्हाने झाल्याचे नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. मध्यंतरी सकाळी व रात्री गारवा आणि दुपारी कडक उन्ह, असे वातावरण होते. मात्र, मागच्या दोन ते चार दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाले आहेत. दिवसा उन्हाचा प्रचंड तडाखा व रात्रीही उष्मा अशा प्रकारचे वातावरण अनेक शहरांत पहायला मिळत आहे. त्यामुळे होळीआधीच यंदा उन्हाळय़ाची तीव्रता वाढल्याचे दिसून येते.
पुढच्या काही दिवसांत राज्याच्या बहुतांश भागांतील तापमान वाढणार असून, विदर्भ, मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्रात पारा अधिक राहणार आहे.
अधिक वाचा : आचारसंहिता भंगप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध तक्रार
मागच्या 24 तासांत राज्याच्या काही भागांत नोंदविण्यात आलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे : पुणे 34.6, कोल्हापूर 33.4, महाबळेश्वर 29.7, नाशिक 34.3, सांगली 35, सातारा 33.8, सोलापूर 36.2, मुंबई 32.2, अलिबाग 33, रत्नागिरी 35.3, पणजी 36.2, औरंगाबाद 34, परभणी 35.9, अकोला 37.5, बुलढाणा 36.2, चंद्रपूर 36, गोंदिया 34.2, नागपूर 34.8, वाशिम 36.2, वर्धा 35.9.