अमेरिकेच्या प्रसारमाध्यमाला दिले प्रत्युत्तर : कुठलाही पुरावा सादर केला नसल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेत राहत असलेला खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या अयशस्वी कटात भारतीय अधिकाऱ्यांचा हात होता, याचबरोबर कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या भारतीय हस्तकांनी केली होती असा दावा अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने एका वृत्तअहवालात केला होता. यावर भारताने प्रतिक्रिया देत हा दावा खोडसाळ आणि चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा गंभीर प्रकरणात अत्यंत बेजबाबदार अहवाल प्रकाशित करण्यात आल्याचे भारताने सुनावले आहे. अमेरिकेच्या वृत्तपत्राने भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’वर आरोप केला आहे. तसेच वृत्तपत्राने यासंबंधी एका रॉ अधिकाऱ्याचा नामोल्लेख केला आहे.
अमेरिकेच्या प्रसारमाध्यमाच्या अहवालात अनेक आधारहीन दावे करण्यात आले आहेत. अमेरिकेकडून संबंधित प्रकरणात भारत सरकारशी संपर्क साधण्यात आला होता आणि भारत सरकारने याकरता एक चौकशी समिती स्थापन केली आहे. अमेरिकेने केलेल्या आरोपांसंबंधी आम्ही त्यांच्याकडून इनपुट्स मिळविले आहेत. भारत सरकारकडून स्थापन उच्चस्तरीय समिती चौकशी करत आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या इनपुट्सची दखल घेत त्याची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. अशा स्थितीत विनाकारण कयास व्यक्त करणे आणि बेजबाबदार वक्तव्य करणे योग्य नसल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सुनावले आहे.
अमेरिकेच्या मॅनहॅटन न्यायालयात पन्नूच्या हत्येच्या कटाच्या आरोपांवरून खटला देखील सुरू आहे. याच्या अंतर्गत भारतीय नागरिक निखिल गुप्तावर आरोप आहे. निखिल गुप्ता सध्या चेक प्रजासत्ताकच्या तुरुंगात आहे. तेथील कायदामंत्री अमेरिकेकडून दाखल प्रत्यार्पणाच्या अर्जावर विचार करत आहेत. हा अर्ज मंजूर झाल्यास निखिल गुप्ताला अमेरिकेच्या स्वाधीन केले जाऊ शकते. तर पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय हस्तकांचा हात असल्याचा दावा चुकीचा आहे. याप्रकरणी कुणीच ठोस पुरावे सादर केले नसल्याचे भारताने अनेकदा म्हटले आहे.
मागील वर्षी जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडात हत्या करण्यात आली होती. निज्जरची हत्या भारतीय हस्तकांनी केल्याचा आरोप कॅनडाने केला होता, परंतु अद्याप कॅनडाने यासंबंधी कुठलाच पुरावा सादर केलेला नाही. कॅनडा सरकारच्या भूमिकेमुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत.