बलाढय़ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारताला कामगिरी उंचावण्याची गरज, फॉर्म व इतिहास ऑस्ट्रेलियाच्या बाजूने
वृत्तसंस्था/ केपटाऊन
भारत व ऑस्ट्रेलियन महिला यांच्यात महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना आज गुरुवारी येथे होत असून आतापर्यंत पॅची प्रदर्शन केलेल्या भारतीय संघाला या सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला खेळ निश्चितच उंचवावा लागणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे प्रक्षेपण होईल.
गेली पाच वर्षे भारतीय महिला संघाची अव्वल पाच संघांमध्ये गणना होत आहे. मात्र त्यांना एकदाही प्रमुख स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यांनी अपेक्षेप्रमाणे या स्पर्धेची पुन्हा एकदा म्हणजे सलग तिसऱयांदा उपांत्य फेरी गाठली आहे. मागील वेळेस भारताने अंतिम फेरीही गाठली होती. पण अखेर त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यापूर्वी भारतीय संघाने स्वतःहूनच स्वताचे नुकसान करून घेतले आहे, विशेषतः बाद फेरीत इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याकडून असा खेळ झाला आहे. मागील टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता आणि अगदी अलीकडे म्हणजे मागील वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाच्या लढतीतही भारताला ऑस्ट्रेलियाकडूनच हार पत्करावी लागली होती.
2017 मध्ये भारतीय महिलांनी वनडे विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यापासून भारतातील महिला क्रिकेटला उभारी आली आहे. आता या संघाने करो या मरो असे स्वरूप प्राप्त झालेल्या उपांत्य सामन्यात सुधारित प्रदर्शन करून वचनपूर्ती करण्याची वेळ आली आहे. गटसाखळी फेरीत चारपैकी तीन सामने भारताने जिंकले असले तरी एकाही सामन्यात त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन झालेले नाही. त्यात आयर्लंडविरुद्धच्या सामन्याचाही समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध भारताला एकमेव पराभव स्वीकारावा लागला होता.
आतापर्यंतचे या स्पर्धेतील भारताचे प्रदर्शन पाहता ज्या काही त्रुटी, अडचणी आहेत, त्या दूर करून या सामन्यात यशस्वी कामगिरी करतील, अशी आशा करावी लागेल. आघाडी फळीच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव, रिचा घोषचा अपवाद वगळता षटकार मारण्याच्या क्षमतेचा अभाव, डॉट बॉल्स खेळण्याचे वाढते प्रमाण या काही भारताच्या प्रमुख त्रुटी आहेत. शेफाली वर्माने आंतरराष्ट्रीय पदार्पण करून तीन वर्षे उलटली आहेत. ती अजून टीनेजर असली तरी झालेल्या चुकातून ती कोणताही बोध घेतलेला नाही, हेच दिसून आले आहे. स्ट्राईक रोटेट करण्यात ती कमी पडते आणि उसळत्या चेंडूवर ती गोंधळताना दिसते.
कर्णधार हरमनप्रीत कौरकडूनही या स्पर्धेत लक्षात रहावी अशी कामगिरी झालेली नाही. त्यामुळे तीदेखील दडपणाखाली असेल. षटकार मारण्याची क्षमता असणाऱया फलंदाजांपैकी ती एक आहे, मात्र तिच्या कामगिरीतच सातत्याचा अभाव आहे. बाद फेरीत भारताला पराभव स्वीकारावा लागल्यास तिची नेतृत्वाची कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जेमिमा रॉड्रिग्सने आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे, मात्र याहून सरस कामगिरी करून संघाला मदत करण्याची गरज आहे. स्टार फलंदाज स्मृती मानधनाने सातत्यपूर्ण प्रदर्शन केले असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध यश मिळविण्यासाठी तिची कामगिरीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघ महत्त्वाच्या सामन्यात आपला स्तर उंचावतात आणि अजेय असल्यासारखा खेळ करतात, असा त्यांचा लौकीक आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील हा संघ टी-20 मध्ये सलग 22 सामने जिंकत उपांत्य फेरीत उतरणार आहे. मार्च 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडकडून टी-20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आतापर्यंत कोणत्याही फॉरमॅटमध्ये मिळून त्यांनी केवळ दोन अधिकृत सामने गमविले आहेत. आणि विशेष म्हणजे हे दोन्ही सामने त्यांनी भारताविरुद्धच गमविले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये मुंबईत झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 4-1 अशी मात केली होती.
गोलंदाजीच्या विभागात वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकुर सर्वोत्तम गोलंदाज ठरली असून तिने आतापर्यंत 7 बळी मिळविले आहेत. त्यात इंग्लंडविरुद्ध 15 धावांत मिळविलेल्या 5 बळींचा समावेश आहे. आयर्लंडविरुद्ध दीप्ती शर्माने एकच षटक टाकले, त्यात ती महागडी ठरली असली तरी स्पिन विभागात तिनेच आतापर्यंत सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध अचूक गोलंदाजी केली तरच त्यांचा निभाव लागू शकतो.
आजवरची ऑस्ट्रेलियाची कामगिरी पाहता ते हा सामना जिंकतील, असे वाटते. मात्र सलामीवीर बेथ मुनीला भारताचीच जास्त धास्ती वाटत आहे. ‘हा सामना अतिशय चुरशीचा होईल, अशी माझी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षात भारताने आमच्यासमोर तगडे आव्हान उभे केले असून त्यांच्या संघात अनेक मॅचविनर्सही आहेत. त्यामुळे हा सामना आमच्यासाठी सोपा जाईल, अशी आम्ही अजिबात अपेक्षा करीत नाही. आमच्याविरुद्ध खेळण्याची त्यांची स्टाईल आम्ही पाहिली आहे. ते आम्हाला चांगले जाणून आहेत, याची आम्हाला जाणीव आहे,’ असे बेथ मुनीने म्हटले आहे.
संभाव्य संघ ः भारतीय महिला ः हरमनप्रीत सिंग (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकुर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.
ऑस्ट्रेलिया महिला ः मेग लॅनिंग (कर्णधार), ऍलीसा हिली, डार्सी ब्राऊन, ऍश्ले गार्डनर, किम गर्थ, हीदर ग्रॅहॅम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासन, ऍलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मुनी, एलीस पेरी, मेगन स्कट, ऍनाबेल सुदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 630 पासून