18 महिन्यांपासून सुरू लसीकरण ः
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना लसीकरणच्या आघाडीवर भारताने इतिहास रचला आहे. देशाने केवळ 18 महिन्यांमध्ये 200 कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण केले आहे. भारतात कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत महत्त्वाची कामगिरी प्राप्त झाली आहे. लोकांना देण्यात आलेल्या डोसची संख्या रविवारी 200 कोटीहून अधिक झाली आहे. 18-59 या वयोगटातील लोकांना आता बुस्टर डोस देण्याची मोहीम सुरू झाली आहे. भारतात मागील वर्षी लसीकरणास प्रारंभ झाला होता.
भारताने मागील वर्षी 21 ऑक्टोबर रोजी कोरोना लसीकरणाचा 100 कोटी डोसचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. केवळ 9 महिन्यांमध्येच भारताला हे यश मिळाले होते. त्याच्या पुढील 9 महिन्यांनी भारताने 200 कोटीचा आकडाही ओलांडला आहे. विशेष बाब म्हणजे देशात निर्मित लसींचाच बहुतांशी वापर केला जात आहे.
200 कोटी डोसचा टप्पा गाठल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. ‘भारताने पुन्हा इतिहास रचला आहे. भारातच्या लसीकरण मोहिमेला अद्वितीय करण्यात योगदान देणाऱया लोकांबद्दल गर्व आहे. या लसीकरण मोहिमेने कोरोना विरोधातील जागतिक लढाईला मजबूत केले आहे’ असे मोदींनी ट्विट करत म्हटले आहे.
मोफत लसीकरण
18-59 वयोगटातील लोकांना बुस्टर डोस देण्यात येत आहे. सरकारच्या विशेष 75 दिवसीय लसीकरण मोहीम ‘कोविड लसीकरण अमृत महोत्सव’ अंतर्गत मोफत बुस्टर डोस देण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 98 टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस मिळालेला आहे. तर 90 टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. आकडेवारीनुसार 15-18 वयोगटातील 82 टक्के किशोरवयीनांना लसीचा एक डोस मिळाला आहे. तर 68 टक्के किशोरवयीनांना दोन्ही डोस देण्यात आले ओत. या वयोगटातील लसीकरण मोहीम 3 जानेवारी रोजी सुरू झाली होती.
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी 200 कोटीहून अधिक डोस प्रदान करण्यात आल्याप्रकरणी आनंद व्यक्त केला आहे. पूर्वी एक लस तयार करण्यास 20-30 वर्षे लागत होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 9 महिन्यांमध्ये भारतीय वैज्ञानिकांकडून निर्मित 2 लसी या मोहिमेला जगात सर्वात वेगवान लसीकरण मोहीम ठरवत असल्याचे उद्गार नड्डा यांनी काढले आहेत.