ड्रगनचा भारतीय प्रसारमाध्यमांना सल्ला
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीन आणि त्याच्या शेजारी देशांदरम्यान बहुतांशकरून तणावपूर्ण संबंध असतात. भारत, जपान आणि तैवानवरून चीनची भूमिका आक्रमक आहे. तैवानचे समर्थन करणाऱया देशांना चीन इशारा देत असतो. चीन आणि तैवानच्या मुद्दय़ावर भारताची भूमिका तटस्थ आहे. याचमुळे चीनने ‘तैवान’ला पाठिंबा न देता ‘वन-चायना पॉलिसी’चे पालन करावे असे चीनने भारताला आवाहन केले आहे. भारताने तैवानसोबत व्यापार आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. चीनकडून भारतातील राज्य अरुणाचल प्रदेशवर दावा करण्यात आल्यावर भारताने 2008 पासून अधिकृत वक्तव्ये आणि संयुक्त घोषणापत्रांमध्ये ‘एक चीन’ धोरणाचा उल्लेख करणे बंद केले आहे.
जगात केवळ एकच चीन आहे. तैवान हा चीनचा अविभाज्य हिस्सा आहे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे सरकार पूर्ण चीनचे प्रतिनिधित्व करणारे एकमात्र कायदेशीर सरकार आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभा प्रस्ताव 2758 नुसार तैवान हा चीनचा हिस्सा आहे. ‘दोन चीन’ किंवा ‘एक चीन, एक तैवान’ अशी कुठलीच स्थिती नाही. ‘एक चीन’ तत्वला आंतरराष्ट्रीय समुदायाची सहमती असल्याचा दावा भारतातील चीनच्या दूतावासाचे प्रवक्ते वांग जिओजियान यांनी केला आहे.
भारतीय अधिकाऱयांनी एक चीन धोरणाचे पालन करत तैवानसोबत कुठल्याही प्रकारची अधिकृत आदान-प्रदान रोखावी. भारतीय प्रसारमाध्यमांनी चीनच्या सार्वभौमत्वाशी निगडित मुद्दय़ांवर योग्य भूमिका मांडावी, ‘तैवान स्वातंत्र्या’साठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊ नये असे चीन दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
अमेरिकेच्या संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी आणि त्यानंतर अनेक अमेरिकन अधिकाऱयांनी ऑगस्टमध्ये तैवानचा दौरा केला होता. तेव्हापासून चीन आणि तैवानदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने तैवानला जाहीर समर्थन दर्शवत संरक्षण सहकार्य सुरू केले आहे. तैवानला अमेरिकेकडून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा पुरविण्यात येत आहे.