वृत्तसंस्था/ सिल्हेत
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने यापूर्वीच उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. सोमवारी भारताचा सामना थायलंडबरोबर होणार असून या सामन्यात भारतीय संघव्यवस्थापन नव्या खेळाडूंना खेळविण्याचा प्रयोग करेल, असा अंदाज आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी दुपारी 1 वाजता प्रारंभ होईल.
या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघ व्यवस्थापनाने अंतिम अकरा खेळाडूंमध्ये विविध खेळाडूंना संधी दिली आहे. पुढील वर्षी होणाऱया महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आतापासूनच भारतीय निवड समिती नव्या खेळाडूंची चाचपणी करीत आहे. या पाकविरुद्ध सामन्यात झालेल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात प्रवेश केला होता. मधल्या फळीमध्ये विविध फलंदाजांना संधी देण्यात आली. पण या सामन्यात भारतीय महिला संघाला तब्बल सहा वर्षानंतर पाककडून पहिला पत्करावा लागला होता.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघाची भिस्त प्रामुख्याने सांघिक कामगिरीवर राहिल. भारताची गोलंदाजी आतापर्यंत समाधानकारक झाली असून त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे. भारतीय संघातील फलंदाज शेफाली वर्माला या स्पर्धेत फलंदाजीचा सूर मिळाला हेच महत्त्वाचे आहे. गेल्या सामन्यात सलामीच्या शेफाली वर्माने अर्धशतक झळकविले होते. स्मृती मानधनाकडून सातत्याने चांगली कामगिरी होत आहे. गेल्या सामन्यात हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आली होती. दुखापतीनंतर जेमिमा रॉड्रिग्युजचे संघात पुनरागमन होत आहे. या स्पर्धेत रॉड्रिग्युजने सर्वाधिक धावा जमविल्या आहेत. दिप्ती शर्माची गोलंदाजी आणि फलंदाजीतील कामगिरी बऱयापैकी होत आहे. या स्पर्धेत भारतातर्फे दिप्ती शर्माने आतापर्यंत सर्वाधिक बळी मिळविले असून बांगलादेशची रुमाना अहमद आणि थायलंडची पुतावाँग यांनी प्रत्येकी आठ बळी घेत संयुक्त आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला रिचा घोषच्या रुपात नवी यष्टीरक्षक लाभली आहे.
थायलंडच्या महिला संघाने या स्पर्धेत आपले शेवटचे तिन्ही सामने जिंकले आहेत. थायलंडने पाकिस्तानला पराभूत करण्याचा नवा इतिहास नोंदवला आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात थायलंड सध्या सहा गुणासह चौथ्या स्थानावर आहे. भारत 8 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. गेल्या वेळी या दोन संघामध्ये झालेल्या सामन्यात भारताने थायलंडवर सहज विजय मिळविला होता.