विजयाचा प्रबळ दावेदार भारतीय संघ सातव्या जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी
सरस प्रदर्शन साकारले तरच लंकेला विजयाची संधी
सिल्हेत-बांगलादेश / वृत्तसंस्था
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज (शनिवार दि. 15) श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक महिला टी-20 स्पर्धेतील अंतिम लढतीत मैदानात उतरेल, त्यावेळी स्पर्धेतील सातवे जेतेपद जिंकण्याचे आणि त्याचबरोबर आशियाई क्रिकेटमधील साम्राज्य नव्याने अधोरेखित करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर असणार आहे. लंकन संघाच्या तुलनेत भारतीय संघ बराच मजबूत असून जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून त्यांना गणले गेले आहे. आजच्या अंतिम लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
या स्पर्धेच्या मध्यात भारतीय व्यवस्थापनाने काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत राखीव खेळाडूंना संधी दिली आणि या राखीव खेळाडूंनीही अपेक्षापूर्ती करत सातत्यपूर्ण योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मानधना यांचे आदर्शवत योगदान नसताना देखील संघाने लक्षवेधी यश प्राप्त केले.
कर्णधार हरमनप्रीत कौर (81 धावा) या स्पर्धेत फक्त 4 सामने खेळली आणि यात तिने केवळ 72 चेंडूंचा सामना केला. तीन सामन्यात नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱया स्मृती मानधनाने देखील एका सामन्याकरिता विश्रांती घेतली. भारतीय महिला संघातील कनिष्ठ खेळाडूंनी देखील दडपण उत्तम हाताळत यश खेचून आणणे लक्षवेधी ठरले.
18 वर्षीय शफाली वर्मा (161 धावा व 3 बळी), 22 वर्षीय जेमिमा रॉड्रिग्यूज (215 धावा) व 25 वर्षीय दीप्ती शर्मा (94 धावा व 13 बळी) यांनी या स्पर्धेत संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. साखळी फेरीत भारताला फक्त कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला असून त्यावेळी प्रशिक्षक रमेश पोवार व कर्णधार हरमनप्रीतने आखलेला गेमप्लॅन संघावर उलटला होता. मात्र, दुसऱया उपांत्य फेरीत लंकेने पाकिस्तानचा धुव्वा उडवला असल्याने भारताला पाकविरुद्ध मागील पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
लंकेचे बहुतांशी फलंदाज बॅडपॅचमध्ये
तूर्तास, कागदावर लंकन संघ भारतीय संघाच्या आसपास देखील नाही, हे दोन्ही संघातील खेळाडूंच्या प्रदर्शनावरुन दिसून येते. लंकेतर्फे रणसिंघे या एकमेव फलंदाजाचा स्ट्राईकरेट 100 पेक्षा अधिक राहिला आहे. हर्षिथा (201 धावा) व निलाक्षी डीसिल्व्हा (124 धावा) यांनी 100 पेक्षा अधिक धावांचे योगदान दिले. मात्र, चमारी अटापटू ही लंकेतील सर्वात अनुभवी खेळाडू 85 च्या स्ट्राईकरेटने जेमतेम 96 धावा जमवू शकली. गोलंदाजीत केवळ डावखुरी फिरकीपटू इनोका रणवीरा 12 बळी घेण्यात यशस्वी झाली असून आजच्या लढतीतही तिच्यावर संघाची बरीच भिस्त असेल.
वास्तविक, चार वर्षांपूर्वी बांगलादेश संघाने या स्पर्धेच्या मागील फायनलमध्ये फेवरीट संघाला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, लंकेने भारताला अशा रितीने धक्का देणे अधिक आव्हानात्मक असेल. भारताला धक्का देण्याचे लक्ष्य प्रत्यक्षात साकारायचे असेल तर तिन्ही आघाडय़ांवर सरस प्रदर्शन साकारण्याबरोबर लंकेला नशिबाची साथ लाभण्याची अपेक्षाही करावी लागेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, एस. मेघना, जेमिमा रॉड्रिग्यूज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), दयालन हेमलता, स्नेह राणा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकुर, मेघना सिंग, किरण नवगिरे, पूजा वस्त्रकार.
श्रीलंका ः चमारी अटापटू (कर्णधार), निलाक्षी डीसिल्व्हा, कविशा दिलहारी, अचिनी कुलसुरिया, सुगंधा कुमारी, हर्षिथा समरविक्रमा, मदुशिका मेथनंदा, हसिनी पेरेरा, ओधादि रणसिंघे, इनोका रणवीरा, अनुष्का संजीवनी, कौशनी नुथ्यांगना, माल्शा शेहानी, रश्मी सिल्व्हा.
सामन्याची वेळ ः दुपारी 1 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
पाकिस्तानला नमवल्याने लंकेचे मनोबल उंचावलेले
आशिया चषक महिला गटातील या स्पर्धेत उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाल्यानंतर भारत-पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचतील, असा होरा होता. अपेक्षेप्रमाणे भारताने पहिली उपांत्य लढत सहज जिंकली. मात्र, दुसऱया उपांत्य फेरीत लंकेने पाकिस्तानवर निसटती मात करत सनसनाटी निकाल नोंदवला. या विजयानंतर लंकन खेळाडूंनी केलेल्या डान्सचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. पाकिस्तानविरुद्ध त्या यशामुळे लंकन संघाचे मनोबल उंचावलेले असणार आहे.
दिग्गज खेळाडू बहरात असल्याने भारत फेवरीट
भारतीय संघासाठी जेमिमा रॉड्रिग्यूजचे सातत्यपूर्ण योगदान व दीप्ती शर्माचा अष्टपैलू खेळ विशेष महत्त्वाचे ठरत आले आहेत. या स्पर्धेपूर्वी खराब फॉर्ममध्ये राहिलेल्या शफाली वर्माला देखील उत्तम सूर सापडला असून तिने फलंदाजीबरोबर लेगब्रेक गोलंदाजीतही समयोचित योगदान दिले आहे. मंदगती गोलंदाजीच्या आघाडीवर दीप्ती, राजेश्वरी गायकवाड व स्नेह राणा किफायतशीर मारा करत आले आहेत. यामुळे रेणुका सिंग व मेघना सिंग या सीमर्सची फारशी आवश्यकता देखील भासलेली नाही. यापैकी मेघनाने तर थायलंडविरुद्ध उपांत्य लढत देखील खेळली नाही.
असे असेल खेळपट्टीचे स्वरुप
सिल्हेत स्टेडियमवरील ट्रक स्लोअर साईडची असून यामुळे फटकेबाजी करणे कठीण असणार आहे. साहजिकच, दोन्ही संघांना खराब चेंडूंची प्रतीक्षा करण्याबरोबरच स्ट्राईक रोटेट करण्यावर भर द्यावा लागेल, असे संकेत आहेत.
राऊंड रॉबिन लढतीत भारताची बाजी
या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत-लंकेचे संघ आमनेसामने भिडले, त्यावेळी भारताने एकतर्फी विजय नोंदवला होता. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकन संघाचा डाव 109 धावांमध्ये खुर्दा झाला होता.