मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ने कर संकलनात केलेल्या परिवर्तनामुळे भारताने विकासाच्या दिशेने झेप घेतली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
व्यावसायिक कर खात्यातील अधिकाऱयांसाठी मंगळवारी पणजीत आयोजित क्षमता निर्माण कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. नवी दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेतर्फे (आयसीएआय) या दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जीएसटीमुळे देशातील कर संकलन आणि व्यवसाय वाढीमध्ये मोठे परिवर्तन आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या क्रांतिकारी कर सुधारणा स्थिर झाल्या आहेत. त्यामुळे भारत वाढ आणि विकासाच्या दिशेने जात आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
आयसीएआयच्या तज्ञांकडून गोव्यातील अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यातून केवळ कर संकलनच नव्हे तर व्यावसायिक सुलभता येणासही मदत होणार आहे. त्याशिवाय या प्रशिक्षणामुळे करदात्यांच्या विविध समस्यांचेही निराकरण करणे शक्य होईल, असे सावंत म्हणाले.
कर विभाग अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच जीएसटी विभाग आणि आयसीएआय यांच्यात सामंजस्य करार करण्यात येईल. त्यामुळे आमच्या अधिकाऱयांना सतत प्रशिक्षण मिळेल. त्यायोगे कर संकलन आणि करदात्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयसीएआयच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.