जागतिक स्तरावर नेतृत्वासाठी भारताची आगेकुच : अॅपलचा वाटा लक्षणीय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मेक ईन इंडिया अंतर्गत भारताने स्मार्टफोन निर्मितीमध्ये मोठी कामगिरी बजावली असून निर्यातीमध्येदेखील कौतुकास्पद कामगिरी पार पाडली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. भारताने 11 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले असल्याची माहिती त्यांनी दिली. स्मार्टफोन निर्मितीमध्ये भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या दिशेने कौतुकाची कामगिरी करतो आहे.
11 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या स्मार्टफोनची निर्यात भारताने केली असून यामध्ये अॅपल या जगप्रसिद्ध कंपनीचा स्मार्टफोनमधील हिस्सा हा जवळपास निम्मा राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक ईन इंडिया या आवाहनाला चांगला प्रतिसाद उद्योजक कंपन्यांनी दिला आहे. भारत हा इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.
किती झाली निर्यात
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारतातून 90 हजार कोटी रुपयांची स्मार्टफोनची निर्यात करण्यात आली आहे. याच्या मागच्या आर्थिक वर्षामध्ये 45 हजार कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात करण्यात आली होती. देशातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात देखील सदरच्या आर्थिक वर्षामध्ये 58 टक्के वाढत 1 लाख 85 हजार कोटी रुपयांची झाली आहे.
आयफोन निर्यातीत अॅपलचा वाटा अधिक
भारत मोबाईल निर्यातीच्या बाबतीमध्ये 100 टक्के वृद्धी करण्यासाठी तत्पर असल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. 5.5 अब्ज डॉलर मूल्याच्या मेड ईन इंडिया आयफोन निर्यातीच्या वाट्यामध्ये अॅपलचा हिस्सा 50 टक्के इतका आहे. तर सॅमसंगने 36 हजार कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात केली आहे. या योगे सॅमसंगचा वाटा हा निर्यातीतला 40 टक्के इतका राहिला आहे.