पत्रकार परिषदेत मागणी, लीजपेक्षा जास्त जमीन बळकावली असल्याचा दावा
सांगे : उगे, सांगे येथे गेली अनेक वर्षे बेकायदा पाषाणी खडीच्या खाणी चालत असून प्रत्यक्ष्घत खाण चालविण्यासाठी जे लीज देण्यात आले आहे त्यापेक्षा अतिरिक्त जमीन बळकावून खाणी चालू आहेत. त्यामुळे सरकारचा महसूल बुडत आहे. या खाणींची सरकारने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सांगे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते तेलोतीन काबो यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत निकी गोम्स आणि मिल्टन गोम्स उपस्थित होते. उगेच्या सर्व्हे क्रमांक 52/0 जमिनीत पाच बेकायदेशीर खडीच्या खाणी चालतात. आपण 2021 पासून आरटीआयच्या अंतर्गत माहिती मिळविली असून मिळालेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले आहे. लीजची मुदत संपल्यानंतरही खाणी कशा काय चालू आहेत, असा सवाल काबो यांनी विचारला. जर खाण खाते म्हणते की, लीज संपल्यावर नूतनीकरण करू शकत नाही, तर कोणाच्या आशीर्वादामुळे या खाणी चालत आहेत, असा सवाल त्यांनी केला. याबाबत आपण सांगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलीस निरीक्षकांनी उलट माझ्याविऊद्धच कलम 107 खाली गुन्हा दाखल केला, असा दावा काबो यांनी केला. मी सांगेतील मामलेदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस स्थानक तसेच उपअधीक्षक, अधीक्षक, खाण विभाग यांच्याकडे तक्रार केलेली आहे. पण कुणीच दखल घेत नाही. याचे कारण काय असा प्रश्न पडतो, असे ते म्हणाले. खाणी चालविण्यासाठी जे लीज देण्यात आले आहे त्यापेक्षा किती तरी पट अतिरिक्त जमिनीत पाषाण फोडणाऱ्या खाणमालकांनी शिरकाव केला आहे आणि बेकायदा खडीचे काम चालू आहे. तरीही संबंधित सरकारी विभाग कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे, असा प्रश्न काबो यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कारवाई नाही
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उगे पंचायत सभागृहातील एका कार्यक्रमाला आले असता ग्रामस्थांनी बेकायदेशीर खाणींसंदर्भात त्यांना फाईल दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी खडीच्या खाणी बेकायदा चालत असतील, तर कारवाई करू असे सांगितले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या शब्दाला मान दिलेला नाही. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. लीजपेक्षा जास्त जमीन वापरून पाषाण फोडणाऱ्यांकडून सरकारने पैसे वसूल केले पाहिजेत. सरकारने लीजपेक्षा प्रत्यक्षात किती जास्त जागा वापरण्यात आली आहे त्याचे सर्वेक्षण करून कारवाई करावी तसेच दंड ठोठवावा. स्थानिक आमदार असलेले समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनीही यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी काबो यांनी केली.