अध्याय पहिला
बाप्पा राजाला सांगतायत की, भरपूर संपत्ती, खूप विषयोपभोग, चांगले नातेवाईक, अलौकिक अशा स्वरूपाच्या स्त्राrचा योग, राज्ययोग, हत्ती अथवा अश्व यांचा योग, इंद्रपदाचा योग, सत्यलोकाची प्राप्ती ह्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला चांगला योग म्हणता येणार नाही. शिवपद अथवा विष्णुपद यांची प्राप्ती होणे हा चांगला योग नव्हे. हे राजा, सूर्यत्व, चंद्रत्व, कुबेरत्व, वायुत्व, अग्नत्व, अमरत्व, यमत्व, वरुणत्व, नैर्त्रुत्य अथवा सार्वभौमता यांची प्राप्ती होणे हे देखील पारमार्थिक दृष्ट्या योग नव्हेत.
राजा चांगला योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणं. परमात्मा सदैव आनंदात असतो. जर आत्म्याला त्याच्यात मिसळून जायचं असेल तर त्याने सदैव आनंदात रहायला हवं. सामान्य मनुष्य ज्या गोष्टी मिळण्याला चांगला योग समजतो त्या गोष्टी त्याला कायम आनंदात ठेऊ शकत नाहीत. उलट त्या बंध निर्माण करतात. आत्म्यावर बंधनं आली की, त्यातून माणसाच्या पुनर्जन्माची खात्री होते. म्हणून त्याला चांगला योग न म्हणता भोग म्हणता येईल. अशा गोष्टी मनुष्य स्वसामर्थ्यावर मिळवू शकतो. त्याला माझ्या मदतीची गरज नाही पण ज्याला शाश्वत आनंद मिळवायचा आहे त्याच्या दृष्टीने चांगला योग कशाला म्हणता येईल ते सांगतो.बाप्पांनी राजाला सुरवातीला मुद्दामहून हे सांगितलं कारण राजा ऐश्वर्यसंपन्न असल्याने त्याला सर्व भौतिक गोष्टी उपलब्ध होत्या. बाप्पांच्याकडून त्याला पारमार्थिक ऐश्वर्याची अपेक्षा आहे. राजाकडे जरी राज्य, संपत्ती इत्यादी गोष्टी असल्या तरी परमार्थ साधण्यासाठी त्या कायम टिकणाऱ्या नसल्याने निरुपयोगी आहेत. परमार्थ साधण्यासाठी कायम टिकणाऱ्या म्हणजे नित्य गोष्टींची आवश्यकता असते. त्यासाठी योगनिष्ठ होणं आवश्यक आहे. सामान्य जीवनात भौतिक इच्छा, अपेक्षांची पूर्ती, विषयसेवन, हवे ते, हवे तेवढे खाण्याची उपलब्धता इत्यादि गोष्टी असल्या की, आपण आपला योग चांगला आहे असे समजतो पण परमार्थ साधण्यासाठी हे सर्व निरुपयोगी असल्याने, त्यापासून सावध राहून त्यावर ताबा मिळवावा लागतो. असं केलं नाही तर मनुष्य कायम आनंदात राहू शकत नाही. त्यासाठी योगनिष्ठ होणं आवश्यक आहे. म्हणजे योगमार्ग धरण्याची गरज आहे. एखाद्या गोष्टीवर निष्ठा असणे म्हणजे त्यात सांगितल्याप्रमाणे करण्याने आपले भले होईल व शेवटी आपल्याला मोक्ष मिळेल अशी खात्री वाटणे.आता उर्ध्वरेते म्हणजे काय ते पाहू. मानवी विर्यात मोठी शक्ती असते. त्याच्या पतनातून ती वाया जाते. म्हणून त्यावर ताबा मिळवून ते ऊर्ध्वगामी केले की, ओज किंवा सामर्थ्य मिळवून देते. योगभूमीचा प्रकाश मनामध्ये प्रकाशित होऊन टिकण्यासाठी योग्याने योगसाधना कशी विकसित करावी त्याचे कोणकोणते टप्पे आहेत ते आपण बाप्पांच्याकडून समजून घेऊ.
योगनिष्ठ होण्याची म्हणजे योगसाधनेतून मोक्ष मिळवून देणाऱ्या मार्गावरून चालण्याची पात्रता अंगी येण्यासाठी बाप्पानी सांगितलेले योगसाधनेतील एकापुढील एक टप्पे आपण क्रमाने पाहणार आहोत. अर्थात हे सर्व सहजसाध्य नसल्याने हळूहळू प्रगती होत जाते हे लक्षात ठेवावे. यासाठी सर्वप्रथम आपल्या आवडत्या दैवताचे स्मरण करून त्याची आपल्याला आवडणारी मूर्ती डोळ्यापुढे आणावी. ती प्रत्यक्ष आपल्यासमोर हजर आहे अशी कल्पना करून त्याची मानसपूजा करावी. त्यानंतर जप करण्यास सुरुवात करावी. जप करताना मन हळूहळू इष्ट दैवताच्या मूर्तीशी एकाग्र होऊ लागेल. मानसपूजा व नामस्मरण या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. मानसपूजा करून आपण दैवताची मूर्ती नजरेपुढं आणत असतो. नामस्मरणाने त्या दैवताला हाक मारत असतो. अशी हाक मारताना त्या दैवताचे अवतारकार्यतील भव्य स्वरूप नजरेपुढं उभं राहतं व आपोआपच नामस्मरण अधिकच आवडीने केलं जातं.
क्रमश: