राजकुमार टोपण्णावर यांची टीका
बेळगाव : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची जन्मभूमी, कर्मभूमी एकच होती. सत्ता गमावल्यानंतर हताश होऊन त्यांनी आपली कर्मभूमी बदलणे योग्य नाही, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपण्णावर यांनी केली आहे. जगदीश शेट्टरना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर उघडपणे टीका होऊ लागली आहे. जगदीश शेट्टर हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी बेळगावसाठी काहीही केले नाही. बेळगावला मंजूर झालेल्या अनेक योजना प्रल्हाद जोशी व जगदीश शेट्टर या दोन्ही नेत्यांनी हुबळी-धारवाडला नेल्या. सत्तेवर असताना बेळगाववर त्यांनी केलेला हा अन्यायच आहे. त्यामुळेच आता जन्मभूमीतून पलायन करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचेही राजकुमार यांनी म्हटले आहे. जगदीश शेट्टर यांनी हुबळी-धारवाड येथे आपल्या कर्मामुळे विश्वास गमावला आहे. त्यामुळेच बेळगावात ते नशिब आजमावू लागले आहेत. बेळगावऐवजी त्यांनी आपल्या जन्मभूमीवरच कर्तृत्व गाजवावे, असा सल्ला राजकुमार यांनी दिला आहे. बेळगावात घर करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बेळगाव आपली कर्मभूमी असल्याचे सांगून त्यांनी हुबळी-धारवाडच्या जनतेचा अवमानच केला आहे. त्यामुळेच ‘गो बॅक शेट्टर’चे अभियान सुरू झाले आहे, अशी टीकाही राजकुमार यांनी केली आहे.