किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : ‘चित्रगाथा स्वातंत्र्याची’ प्रदर्शनाचे उद्घाटन : प्रदर्शनात स्वातंत्र्यसैनिकांची 385 छायाचित्रे
प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला. त्याचे सुराज्य करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या अजोड त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल अनमोल आहे. क्रांतिकारकांनी सशस्त्र लढा देऊन ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. इतिहासाची पुनरावृत्ती टाळून हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुलिंग चेतविले पाहिजे. याच हेतूने ‘चित्रगाथा स्वातंत्र्याची’ हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे, असे विचार एसकेई सोसायटी व लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.
लोकमान्य सोसायटीच्यावतीने ‘चित्रगाथा स्वातंत्र्याची’ हे प्रदर्शन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने आरपीडी महाविद्यालयाच्या लायब्ररी हॉलमध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात अकोल्याचे जयंत सहस्त्रबुद्धे यांनी अथक परिश्रमाने संकलित केलेली स्वातंत्र्य सैनिकांची 385 छायाचित्रे आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर किरण ठाकुर बोलत होते. व्यासपीठावर स्वा. सै. राजेंद्र कलघटगी, स्वा. सै. विठ्ठल याळगी, सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, एसकेई सोसायटीचे संचालक ज्ञानेश कलघटगी, गोविंद काळे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्याचे मोल अनमोल
किरण ठाकुर म्हणाले, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ ही घोषणा लोकमान्य टिळक यांनी बेळगावमधून आज जिथे तरुण भारत आहे, तेथील पटांगणात केली होती. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतानाच हे प्रदर्शनही आम्ही भरविले आहे. गोविंद याळगी आणि त्यांचे कुटुंबीय तसेच आमच्या ठाकुर कुटुंबीयांच्या सदस्यांनी कारावास भोगला. आज अनेक स्वातंत्र्यसैनिक अज्ञात आहेत. इतिहासाच्या प्राध्यापकांनी संशोधन करून त्यांना पुढे आणायला हवे. स्वातंत्र्याचे मोल अनमोल आहे, असे ते म्हणाले.
आपला संसार प्रत्येक जणच करतो. परंतु देशाचा संसार कोण करणार? असा विचार आपण सर्वांनी करायला हवा. प्रत्येक विद्यार्थ्याकडून राष्ट्रभक्तीची गाणी म्हणून घ्या. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची जाणीव तरुणाईला होण्याच्यादृष्टीने हे प्रदर्शन भरविले असून विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राजेंद्र कलघटगी यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा देऊन लोकमान्य सोसायटीच्या तत्पर सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. माधुरी शानभाग यांनी सेल्युलर जेलमध्ये ‘जयोस्तुते’ सादर केल्याची आठवण सांगितली. प्रारंभी शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. गोविंद काळे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या अनुजा नाईक यांनी हे प्रदर्शन आपल्या कॉलेजमध्ये भरणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून तरुणाईपर्यंत राष्ट्रभक्तीचा संदेश निश्चितच पोहोचणार आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले.
प्रदर्शन 7 ऑगस्टपर्यंत
यावेळी एसकेई सोसायटीचे अजित सोलापूरकर, डॉ. डी. पी. वागळे, डॉ. धनश्री आजगावकर, लता कित्तूर, मधुकर सामंत, प्राचार्य बी. एल. मजुकर, प्राचार्य प्रणव पित्रे, प्राचार्य काशिनाथ मेळेद, प्रा. शोभा नाईक, लोकमान्यचे रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी, सत्यजीत नाईक, उज्वला देसूरकर आदी उपस्थित होते. सदर प्रदर्शन दि. 7 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत खुले राहणार आहे.
‘स्वराज्याची घोषणा’ बेळगावमधून
विठ्ठल याळगी यांनी बेळगावच्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास थोडक्मयात कथन केला. लोकमान्य टिळक 1906 व 1916 मध्ये बेळगावला आले. आपले काका गोविंदराव यांनी कडोलकर गल्लीमध्ये मर्यादित स्वरुपात गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली. परंतु त्याचे स्वरुप विस्तारले जावे यासाठी टिळक बेळगावला आले होते. ‘स्वराज्याची घोषणा’ त्यांनी येथूनच दिली. एका अर्थाने ते तेजस्वी सूर्य होते. इतिहास माहिती नसेल तर भविष्य घडणे कठीण होते. त्यासाठी आपल्या पिढय़ांना हे प्रदर्शन दाखविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.