त्या दिवशी मीनलताई अगदी गयावया करतच आल्या. ‘मॅडम, मॅडम चूक झाली माझी. ऐकलं नाही मी..आता काय करावं सुचत नाही. हे प्रकरण आता नक्की वाढणार. अगदी नक्की!’
‘ताई.. शांत व्हा. काहीही होणार नाही..तुम्ही इथे बसा पाहू आधी. मीनलताईंना खुर्चीत बसवलं आणि पाण्याचा ग्लास हातात दिला. त्यांनी घटाघट पाणी संपवले आणि दणकन् ग्लास टेबलावर ठेवला..तसा आपटलाच म्हणा..त्यांची अस्वस्थता, चिडचिड, त्रागा सगळं समोर स्पष्ट दिसत होतं. तसा त्यांचा-माझा परिचय जुनाच. त्यामुळे बऱ्यापैकी कौटुंबिक माहिती होती, कुटुंबीयांसोबत परिचयही होता, परंतु अलीकडे खूप दिवसात भेट झाली नव्हती आणि त्यादिवशी त्या समोर आल्या त्या अगदी वेगळ्या मन:स्थितीत.
‘बरं वाटतंय ना?’ ‘अं..हो.. हो.’
‘बरं..आता मला सांगा काय झालं आहे? कसलं प्रकरण वाढणार म्हणत होतात?
मॅडम, मागे माझ्या एका भाच्याविषयी तुम्हाला सांगितले होते. तुम्ही फोनवरून बोलला होतात त्याच्याजवळ.’
‘हो. मालनताईंचा मुलगा ना? हो हो..तोच.’
‘त्याचं काय झालं? बरा आहे ना तो आता?’
‘कसलं काय..आता त्याला जास्तच भास व्हायला लागलेत. कुणीतरी दिसतं, त्याच्याशी बोलतं म्हणतो..मधेच अगदी शांत असतो. मधेच असं काही झालं की येरझारा घालतो, विचित्र हातवारेही करतो. चेहराच बदलतो त्याचा. काही समजत नाही. काय नाही केलं त्याच्या आईनं..सगळं करून झालं..’
‘बाकी सगळं राहू दे. तुम्ही त्याला मनोविकारतज्ञांकडे घेऊन गेला होतात का?’
‘अं…ते.. ते’
‘काय विचारते आहे मी?’
‘नाही..बाकीचे उपचार केले तिने..’ ‘बाकीचे म्हणजे?’
‘आम्हाला वाटलं तो कुठेतरी सापडला आहे. बाहेरची बाधा आहे.’
‘अहो, काय हे? त्याच्या आईला, तुम्हाला काय सांगितलं होतं? का विनाकारण वेळ काढता?’
‘नाही…आम्हाला वाटलं त्याला बाहेरची बाधा झाली असावी. तसं चुकलंच हो आमचं मॅडम.. आणि एक वेगळा प्रॉब्लेम झालाय. माझ्या बहिणीला वाटलं लग्न केल्यावर सुधारेल तो..म्हणून लग्नासाठी खटपट सुरू होती. तो ठीक असताना मुलगी पाहिली. दोघांची पसंतीही झाली. नंतर ज्यावेळी पुन्हा एकदा सगळे बैठकीसाठी भेटलो तेव्हा याला परत भास होऊ लागले. तो विचित्र बडबड करू लागला. तिथे कुणी आहे वगैरे म्हणू लागला. एकदम विचित्र वागणं. लग्न मोडलं..मुलीकडचे लोक चिडलेच आमच्यावर. तुम्ही रागावू नका, पण..पण..मीच पुढाकार घेतला होता त्यात…’
आता मात्र थोड्या वेगळ्या शब्दात समज देणं गरजेचं होतं. थोडी कानउघाडणी केल्यावर..पुन्हा त्या गयावया करू लागल्या. चुकलं हो, चुकलंच आमचं.. तुम्ही सांगूनही असं वागलो आम्ही. माफ करा.’
‘हे पहा, प्रŽ मी सांगितले किंवा अजून कुणी हा नाही. यामध्ये त्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही आयुष्य पणाला लावताय तुम्ही. लक्षात येतंय का तुमच्या?’
‘अं..हो हो..’ ‘त्याला उपचारांची गरज आहे. आधी नीट बरा तर होऊ दे तो.’
त्याच्या आईला फोन करा. मला बोलायचे आहे. त्यांना थोड्या कडक शब्दातच समज देत महेशला त्वरित मनोविकारतज्ञांकडे नेण्यासंदर्भात सांगितले. दोन दिवसांनी त्यांनी फोन करून उपचारांना सुऊवात झाल्याचेही सांगितले. यासारखीच अनेक उदाहरणे कित्येकवेळा पहायला मिळतात.
नेहाची केसही अशीच काहीशी..नेहाला खूप उदास वाटायचे, तिचे कशातही लक्ष लागत नव्हते. मधेच ती रडायला लागायची. कधी अगदी शांत असायची तर कधी अस्वस्थ. अलीकडे तिची भूकही मंदावली होती. तिला कशातच रस वाटेनासा झाला. काही दिवसांसाठी बदल म्हणून नेहाच्या सासरच्या मंडळींनी तिला माहेरी पाठवले.
तिच्या माहेरच्या मंडळींना आणि सासरीही असे वाटत होते की ‘एक मूल’ झाले की हे सारे सुरळीत होईल. परंतु नेहामध्ये काहीतरी वेगळा बदल झाला आहे हे तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले आणि ती नेहाला घेऊन भेटायला आली. तिच्याशी संवाद साधल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. तिला समुपदेशनासोबतच औषधांचीही गरज होती. तिच्या पतीलाही बोलवून याविषयी सविस्तर बोलणे झाले. समजाऊन सांगितल्यानंतर नेहाला मनोविकारतज्ञांकडे घेऊन जायला ते तयार झाले. योग्य औषधोपचार, समुपदेशन याची सांगड घालत नेहा त्यातून बाहेर पडली.
समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करत असताना अशा अनेक केसेस समोर येतच असतात. काहीवेळा लग्न झालं की सुधारेल किंवा एक मूल होऊ द्या, मग पहा कसं सगळं सुरळीत होतं ते! अशा पद्धतीच्या समजुती अनेकदा पहायला मिळतात.
लग्न झाल्यावर किंवा मुलं झाली की अशा पद्धतीची समस्या सुटेल असं कुटुंबीयांना वाटत असतं. परंतु लग्न हा मानसिक आजारावरचा उपचार नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. अशा मानसिक स्थितीमध्ये लग्न, नातीगोती हे सारं निभावणं त्याला किंवा तिला जमेल का याचा विचार कुटुंबीयांनी करायला हवा. अन्यथा अशा निर्णयातून समस्या सुटण्याऐवजी वेगळ्या समस्या, प्रŽ निर्माण होतात आणि समस्येचा गुंता अधिक वाढत
जातो.
मुळातच शरीरासारखं मनही आजारी पडतं हे आजही अनेकांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आले तरी काहीवेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. लग्न झाल्यावर सुधारेल असं वाटून लग्न उरकून टाकलं जातं. तर काही वेळा आजाराविषयीची, सुरू असलेल्या औषधाविषयी पूर्वकल्पना न देता लग्न केलं जातं, समोरच्या व्यक्तीला हे काहीच माहीत नसल्याने सुरू असलेले उपचार थांबतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अचानक औषधे थांबवली की काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू होऊ शकतो. याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या लोकांसमोर अचानक काही गोष्टी येतात आणि मग कशी फसवणूक झाली याचे वाद निर्माण होतात. संसार तर मोडतोच परंतु ज्या व्यक्तीला असा त्रास होत होता तिची परवड होते. तिला अजून वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
अर्थात ज्यांना काही मानसिक विकारांचा सामना करावा लागला आहे त्यांनी लग्न करायचेच नाही असा त्याचा अर्थ नाही. आधुनिक उपचारपद्धती, औषधे, समुपदेशन यांचा योग्यवेळी आधार घेतला तर अनेक केसेसमध्ये चांगली सुधारणा होते. सुधारणा झाल्यानंतर विवाह करत असताना ज्यांच्यासोबत नाते जुळणार आहे त्या कुटुंबाला सुरू असलेल्या औषधोपचारांची नीट कल्पना देऊन परस्पर संमतीने लग्न झाले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. काही औषधे काही काळ सुरू ठेवायची असतील तर त्यात खंड पडत नाही. परस्पर सामंजस्याने, जीवनाची वाटचाल अधिक उत्तम होण्यास मदत होते.
मनोविकार हे औषधे, समुपदेश या साऱ्याने आटोक्मयात येऊ शकतात परंतु त्यासाठी मनही आजारी पडते याचा स्वीकार आणि तज्ञांचे मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे आहे. रोगाचे वेळेवर निदान आणि उपचार या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मनाच्या बाबतीत अधिक सजग होत त्यादृष्टीने वाटचाल झाली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील हे मात्र निश्चितच!
-अॅड. सुमेधा संजीव देसाई