पुणे / प्रतिनिधी :
विरोधी पक्षातील लोकांवर सातत्याने सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) माध्यमातून धाडी टाकून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ‘ईडी’विरोधात राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी येथे दिला. सदानंद कदम यांच्यावरील ईडीच्या कारवाईमागे रामदास कदम यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
शिवसेनेच्या (ठाकरे) पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. त्या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आनंद भोईर आदी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, ‘जेलभरो आंदोलना’संदर्भात वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा सुरू आहे. देशातील स्वायत्त संस्थाच्या गैरवापराबद्दल विविध पक्षांच्या नऊ प्रमुखांनी पंतप्रधानांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पंतप्रधान किंवा त्यांच्या कार्यालयाने उत्तर देणे अपेक्षित असताना भाजपचे प्रवक्तेच याविषयी जास्त बोलत आहेत.
अधिक वाचा : महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल स्थानी येईल
किरीट सोमय्या यांनी यापूर्वी प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर यांच्याविरोधात रान उठवले होते. आर्थिक घोटाळा बाहेर काढण्यासाठी सरनाईक यांच्याविरोधात 22 पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळी यांच्याविरोधात आठ, यशवंत जाधव यांच्याविरोधात 16, अर्जुन खोतकरांच्या विरोधात नऊ पत्रकार परिषदा घेतल्या. मात्र, आता संबंधित नेत्यांनी पक्ष बदलताच सोमय्यांनी त्या प्रकरणांवर बोलणे सोडले. ते आता शांत कसे झाले, असा सवाल त्यांनी केली.