राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना जालन्यात मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीहल्ल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी राज्य सरकारच्या आदेशानंच लाठीहल्ला केला असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यावर राज्य सरकारकडून कडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.विराधकांनी लाठीहल्ल्याचा आदेश वरून आल्याचे करत आहेत जर त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना केले आहे. तसेच त्यांनी जर हे सिद्ध केले तर मी राजकारण सोडीन असे खुले आवाहन अजित पवार यांनी विरोधकांना दिले आहे.
त्यानंतर अजित पवार गेले दोन दिवसापासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. त्यामुऴे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त करताना म्हणाले, “मी दोन दिवस आजारी असल्याने बाहेर पडलो नाही. त्यावरून विरोधकांनी अनेक समज- गैरसमज पसरवला. जालन्यात जी घटना घडली ती व्हायला नको होती.” असे अजित पवार म्हणाले.
लाठीचार्ज आदेशावर बोलताना अजित पवार म्हणाले, “आम्ही तिघांपैकी कुणी तसे आदेश दिले असतील तर राजकारणातून बाजूला होईन. पण तसं सिद्ध नाही झालं, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावं. विरोधकांमध्ये अशी हिंमत आहे का? विरोधक जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. वरून आदेश आले असं सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणाल ते करू. समाजात अस्वस्थता निर्माण करायची आणि त्यातून काही साध्य करता येतं का असा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे याची जाणीव सगळ्यांना असायला हवी.”अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं.
पुढे बोलताना ते म्हणाले, “अशा घटना घडतात तेव्हा राज्याचं हित डोळ्यांसमोर घेऊन भूमिका घ्यायला पाहीजे. पण विरोधकांकडून यात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकांना विविध पदांवर संधी मिळाली असली तरी त्यात्या वेळी आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली. पण कायद्याच्या चौकटीत बसणारे ही तो प्रयत्न बसला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातही तो मान्य असायला पाहीजे.” असं अजित पवारांनी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी जनतेला आवाहन केले की जाळपोळीमुळे राज्याचे खुप नुकसान होत असे सांगताना ते म्हणाले “जाळपोळ, बंद वगैरे राज्याचंच नुकसान होत आहे. १० कोटी रुपयांच्या एसटी बसेस जाळल्या. हे नुकसान राज्याचंच आहे. मागच्या काळात मराठा समाजानं शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केलं. पण आत्ता त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला.”, असं अजित पवार म्हणाले.