प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील : राणांनी बच्चू कडूविरोधात केलेली तक्रारीतील खरे बाहेर येण्याची गरज : बच्चू कडू याचा निश्चित सोक्षमोक्ष लावतील : सांगली-पेठ रस्ता केंद्राकडे, त्यामुळे टीका करणाऱ्या मंडळींनी केंद्रावर टीका करतो हे ध्यानात घ्यावे
प्रतिनिधी/सांगली
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस हे त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकत नाहीत. कारण शिंदे गटातील सर्वच आमदारांना मंत्रीपद पाहिजे. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठय़ा अडचणी आहेत. त्यामुळे आता मंत्रीमंडळाचा विस्तार होणे नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सांगली येथील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात ते पत्रकार बैठकीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक विषयाबाबत आपली मते व्यक्त केली. सांगली-पेठ रस्ता निश्चितच खराब झाला आहे. पण, दोन वर्षांपासून तो रस्ता केंद्रसरकारकडे आहे त्यामुळे टीका करणाऱयांनी केंद्रावर टीका करत आहोत, याचे भान ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच राणा यांनी केलेल्या टीकेविरोधात आमदार बच्चू कडू यांनी त्यांना आव्हान दिले आहे. पण, राणा हे जर ठामपणे कडू यांनी खोके घेतले म्हणतात. तर त्यामध्ये खरे काय आहे? हे बाहेर येण्याची गरज आहे. तसेच बच्चू कडू यांचा स्वभाव मला माहिती आहे. ते मागील मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यामुळे ते या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. ते सध्याच्या सरकारबरोबर आहेत. पण, ते सरकारच्या कधीही विरोधात जावू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी सांगली जिल्हय़ातील विविध विषयावर मत मांडताना स्पष्ट केले की, नवीन पालकमंत्री हे सध्याच्या जिल्हा नियोजनमधील कोणत्याही कामाला स्थगिती देतील, अशी कोणतीही शक्यता नाही. नवीन आर्थिक वर्षात होणाऱया जिल्हा नियोजनच्या बैठकीत ते अनेक विषयांना बगल देवू शकतात. पण, ज्या विकासकामांना मंजूरी मिळाली आहे. त्याचा निधी ते कदापि रोखू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
सांगली-पेठ रस्ता होण्यासाठी सहा ते आठ महिन्याचा कालावधी
सांगली-पेठ रस्त्याच्याबाबत खरी बाजू पुढे येत नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी हा रस्ता राज्य सरकारकडे होता. हा रस्ता करण्यासाठी टोल बसू नये म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि त्यानुसार काही ठराविक टप्प्याचे काम केले होते. पण, त्यानंतर हा रस्ता केंद्र सरकारकडे गेला. केंद्र सरकारने हा रस्ता चौपदरीकरण का सहापदरीकरण यासाठी प्रयत्न सुरू केला. त्यामध्ये त्यांच्याकडून काही कालावधी गेला. आता त्यांनी हा रस्ता चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता करण्याबाबत आदेशही दिले आहेत. तसेच या रस्त्याप्रकरणी आ. सुधीर गाडगीळ यांनीही नितीन गडकरी यांच्याकडे विशेष निधीतून रस्ता करण्याची मागणीही केली होती. त्यामुळे लवकरच या रस्त्याची निविदा निघेल आणि सहा ते सात महिन्याचा कालावधी हा रस्ता करण्यासाठी लागतील, असेही त्यांनी सांगितले.
राणांनी बच्चू कडूंविरोधात खोके घेतल्याचे ठामपणे सांगितले
राणांनी बच्चू कडूंविरोधात त्यांनी खोके घेतल्याचे ठामपणे सांगितले आहे. यातील खरी कोणती गोष्ट आहे, ती आता जनतेसमोर येण्याची नितांत गरज आहे. आमदार बच्चू कडू हे या टीकेने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते प्रसंगी सरकारच्या विरोधातही कडक भूमिका घेतील, असेही त्यांनी सांगितले. राणांच्या पाठीशी कोण आहे, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील खरे लवकरच बाहेर यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कवलापूर विमानतळाच्या जागेबाबत आपणास माहिती नाही
कवलापूर विमानतळासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेबाबत काय व्यवहार झाला आहे, याची कोणतीही माहिती नाही. तसेच ही जागा आता एमआयडीसीकडे आहे आणि त्यांनी काय निर्णय घेतला आहे त्याची माहिती घेतल्यानंतरच त्याबाबत बोलू, असेही त्यांनी सांगितले. सांगलीला चांगले विमानतळ गरजेचे आहे. पण, त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध नाही. ही जर जागा सांगली शहराच्या जवळ मिळाली असती तर विमानतळ निश्चितच झाले असते. यापूर्वी आपण कवठेपिरानला विमानतळ करण्यासाठी प्रयत्न केला होता. पण, ती जमीन काळी असल्याने त्याठिकाणी विमानतळ करण्यास अडचणी आल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील यांच्यावर टीका करून मोठे होणारे अनेकजण
जयंत पाटील यांच्यावर टीका केली की, त्यांना आपण मोठे झालो, असे वाटते. त्यामुळे ते जयंत पाटील यांच्यावर टीका करतात. पण, अशा अनेक टीकाकडे दुर्लक्ष करायचे असते. कारण या टीकेने काहीही साध्य होत नसते. त्यामुळे आम्ही अशा टीकेला उत्तर देत नसल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
अशा मंत्र्याबरोबर भाजप काम करून जनतेचा विश्वास गमावतेय
कृषिमंत्री सत्तार यांनी एका जिल्हाधिकाऱयांना थेट तुम्ही दारू पिता का? असा सवाल केला आहे. एका मंत्र्यांकडून असे बेताल वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. अशा मंत्र्यासोबत भाजपासारखा पक्ष कसा काम करत आहे, याचे आश्चर्य वाटते. अशा मंत्र्यांमुळे भाजपा जनतेतून त्यांच्या पक्षाचाच विश्वास घालवत आहेत, असेही आ. जयंत पाटील यांनी सांगितले.