वृत्तसंस्था/ काकामिघारा (जपान)
भारतीय महिला आज शनिवारी येथे कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेला सुरुवात करताना भारताच्या कनिष्ठ पुऊष हॉकी संघाच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतील. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे आणि भारतीय कनिष्ठ महिला संघ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रथमच आशिया चषक जिंकण्यास उत्सुक असेल.
भारत आज शनिवारी उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेची सुऊवात करेल. 11 जून रोजी समाप्त होणार असलेल्या या महिला कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेतून या वर्षाच्या अखेरीस होणार असलेल्या कनिष्ठ महिला विश्वचषक स्पर्धेसाठीची पात्रता लाभणार असल्याने या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झालेले आहे. महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेतील अव्वल तीन संघ यावर्षी 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत चिलीतील सांतियागो येथे खेळविल्या जाणार असलेल्या महिलांच्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरतील.
प्रीतीच्या नेतृत्वाखालील भारताचा गट ‘अ’मध्ये चार वेळचा विजेता कोरिया, मलेशिया, उझबेकिस्तान आणि चिनी तैपेई यांच्यासोबत समावेश करण्यात आला आहे, तर यजमान जपान, चीन, इंडोनेशिया, कझाकिस्तान आणि हाँगकाँग चीन हे संघ गट ‘ब’मध्ये आहेत. आतापर्यंत झालेल्या सात स्पर्धांत भारताने एक रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकलेली आहेत.
उझबेकिस्ताननंतर भारताची लढत 5 जून रोजी मलेशियाशी आणि त्यानंतर कोरिया (6 जून) तसेच चिनी तैपेईशी (8 जून) होईल. संघाच्या तयारीबद्दल बोलताना कर्णधार प्रीती म्हणाली की, आम्ही या स्पर्धेसाठी गेल्या काही महिन्यांपासून कठोर परिश्रम घेतले आहेत आणि आता आम्ही सराव सत्रादरम्यान जी तयारी केलेली आहे ती अंमलात आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शिवाय त्याच ठिकाणी भारताचा वरिष्ठ हॉकी संघ देखील आमच्यासोबत सराव करत होता. त्यामुळे आम्हाला मदत झाली आणि आमचा आत्मविश्वास देखील वाढला आहे, असे ती म्हणाली.