यक्ष मेघाला प्रयाणाचा योग्य मार्ग सांगू लागतो.
अदेः शृंङ्गं हरति पवनः किंस्विदित्युन्मुखीभिः
दृष्टोत्साहश्चकितचकितं मुग्धसिद्धाङ्गनाभिः।
स्थानादस्मात्सरसनिचुलादुत्पतोदङ्मुखः खं
दिङ्नागानां पथि परिहरन्स्थूलहस्तावलेपान्।।14।।
अर्थः- हे मेघा, प्रथम तू उत्तरेकडे तोंड करून आकाशात उड्डाण कर. तसा तू निघालास म्हणजे तुला पाहून प्राणीमात्रांना आनंद होईल. सिद्धांच्या सुंदर स्त्रिया तुझ्याकडे मान वर करून पहात चकित होऊन म्हणतील की, हे पर्वताचेच शिखर वारा उडवून नेत आहे की काय? मेघा, तू वेगाने पुढे जा आणि दिग्गज ( दिशांचे गज..हत्ती) आपल्या सोंडेने तुला वाटेत तडाखा देतील, तर त्यांना टाळून तू पुढे हो.
मागच्या श्लोकात वारा मंद मंद वहात होता. पण वरील श्लोकात तो शिखरदेखील उडवून देईल की काय इतक्मया जोरात वहातोय. म्हणजेच त्यांचा वेग आता वाढलाय असे वाटते. तो पाहूनच सिध्दांगना चकित होऊन पहात आहेत. ‘सिध्दांगना’ हा शब्द देवयोनिविशेष आहे. सिध्दी ज्यांना प्राप्त आहेत, असे सिद्ध आणि त्यांच्या स्त्रिया म्हणजे सिध्दांगना होत. ह्या सिध्दांचे राहण्याचे ठिकाण पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असते, असे सांगितले आहे. सिध्दांगना मान वर करून पहात आहेत, म्हणजे त्या जमिनीवर कुठे तरी असाव्यात. ‘निचुल’ म्हणजे ‘वेत’ किंवा ‘समुद्रफळ’ असे अमरकोशात म्हटले आहे. ‘दिङ्नाग’ आठ आहेत आणि ते आठ दिशांचे रक्षण करतात. नाग शब्दाचा इथे हत्ती असा अर्थ होतो. त्यानुसार दिग्गज आपल्या सोंडेने समुद्राचे पाणी शोषून घेतात आणि मेघांना देतात, अशी कल्पना केली आहे. त्यावरून यक्षाने मेघाला सावध केले की, समुद्राचे पाणी शोषण्याकरीता दिग्गजांची सोंड कदाचित वाटेत आडवी येईल. मल्लिनाथाच्या टीकेनुसार ‘निचुल’ आणि ‘दिङ्नागाचार्य’ असे दोन महापंडित होऊन गेले. त्यातील निचुल हा कालिदासाचा सहाध्यायी व समर्थक होता, तर दिङ्गनागपाल हा त्याचा प्रतिपक्षी होता. म्हणून जाता जाता त्याला डिवचण्यासाठी कालिदासाने हा श्लोक घातला आहे! गंमत म्हणजे दिङ्गनागाचार्य हा अति स्थूल होता. म्हणून त्याला ‘अद्री’ म्हणजे पर्वत! म्हणून हे मेघा, तू त्या पर्वतरूपी शिखराचा पराभव करून (टाळून) स्वर्गास जाऊन पोच. आणखी एका मतानुसार दिङ्गनाग हा बौद्धधर्मानुयायी होता. कालिदास हा सनातन धर्माभिमानी होता. म्हणून इथे त्याने दिङ्नागाचा उपहास केला आहे. ह्या श्लोकातही श्लेष अलंकार वापरला आहे.