बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते.आता पुन्हा एकदा कंगनाने केलेलं वक्तव्य प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनलं आहे. राजकारणात प्रवेश करण्याबाबत कंगनाने एक मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ही अभिनेत्री निवडणूक लढवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नुकताच कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.’तेजस’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगनाने श्रीकृष्णाचा आश्रय घेतला आहे. नुकतेच तिने द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर मीडियाशी बोलताना अभिनेत्रीने लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. यावेळी ‘भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर मी लोकसभा निवडणूक लढवीन.’ असं ती म्हणाली आहे. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिने सर्वांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता आगामी निवडणुकीची यादी जाहीर झाल्यानंतरच कंगना भाजपच्या वतीने निवडणूक लढवणार की नाही हे कळेल.