रस्त्याच्या दुऊस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांतून तीव्र संताप
वार्ताहर /किणये
कर्ले ते बेळवट्टी या संपर्क रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या बहुतांश ठिकाणी मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. त्यामुळे सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुऊस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व नागरिकांतून होत आहेत. रस्त्याचा डांबरीकरणासाठी मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल ही उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये बऱ्याच ठिकाणचे रस्ते केलेले आहेत. त्या रस्त्यांसाठीही निधी उपलब्ध करण्यात येतो. मात्र बेळवट्टी ते कर्ले या संपर्क रस्त्यासाठी सरकारकडून निधी मंजूर का होत नाही असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून सध्या दुचाकी चालवणेही मुश्कील बनले आहे. 2019 साली अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर पाणी आले होते. त्याचवेळी रस्त्याच्या चार ते पाच ठिकाणी मोठमोठी भगदाड पडलेली आहेत. अद्यापही भगदाड बुजविण्यात आली नाहीत. त्यामुळे या रस्त्यांवरून वाहतूक करावी कशी याची चिंता वाहनधारकांना लागून राहिलेली आहे.
पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण न झाल्यास आंदोलन
पावसाळ्यापूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे होते. पावसाळ्यात कर्ले आणि बेळवट्टी या दोन्ही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता असते. सध्या रस्त्यावरून बैलगाडी घेऊन जाणेही अवघड झाले आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मग दाद मागायची कुणाकडे? संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून डांबरीकरणाला सुरूवात करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू.
– कल्लाप्पा सुतार, बेळवट्टी