सीमाहद्दीवरील प्रवाशांना दिलासा : लालपरीदेखील बेळगावात दाखल
बेळगाव : मागील दोन दिवसांपासून ठप्प झालेली आंतरराज्य बससेवा गुरुवारपासून सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे सीमाहद्दीवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे बससेवेवर परिणाम झाला होता. मात्र गुरुवारपासून महाराष्ट्रात धावणाऱ्या बसेस पूर्ववत सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मंगळवारी धाराशिव येथे कर्नाटकची बस अज्ञातांनी पेटविली होती. त्यामुळे महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. बुधवारी कर्नाटक राज्योत्सव आणि सीमाभागात काळादिन पाळला गेला. त्यामुळे खबरदारी म्हणून परिवहनने आंतरराज्य बससेवा बंद ठेवली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. विशेषत: सीमाहद्दीवर खासगी वाहनांनी या संधीचा फायदा घेत प्रवाशांकडून अधिक भाडे वसूल केले. बससेवा बंद राहिल्याने खासगी वाहनधारकांनी मनमानीप्रमाणे तिकीट आकारणी केली. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसला. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून गुरुवारपासून कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर आदी ठिकाणी बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. दोन दिवस केवळ निपाणीपर्यंत बसेस धावत होत्या. मात्र परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याने महाराष्ट्रात बसेस पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्याप महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलन पेटलेलेच आहे. त्यामुळे परिवहनने धाडसाने महाराष्ट्रात बसेस पाठविल्या आहेत.
लालपरीही दाखल
दोन दिवसांपासून ठप्प असलेली लालपरीदेखील बेळगावात दाखल झाली आहे. शिवाय कोकण, कोल्हापुरातून येणाऱ्या बसेस सुरळीत सुरू झाल्या आहेत.
परिस्थिती नियंत्रणात आल्याने बससेवा सुरू
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्रात धावणाऱ्या बसेस पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून दोन दिवस बससेवा ठप्प होती. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने महाराष्ट्रात बसेस पाठविल्या जात आहेत.
-के. के. लमाणी, डीटीओ बेळगाव