पिंपरी / प्रतिनिधी :
देगलूर, पंढरपूर, कोल्हापूरच्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. पण, त्यानंतरच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजपने जास्त प्रयत्न केले. मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या विनंतीला मान देत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी आताही पुढाकार घ्यावा आणि चिंचवड, कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी अपेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी व्यक्त केली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी स्वत: शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या सर्वांशी आम्ही बोललो आहोत. त्यांना मी भेटायलाही तयार आहे. अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी विनंती केली होती. त्यानंतर आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. जनमताची ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी आहे. चिंचवड आणि कसबा पेठची निवडणूक बिनविरोध करण्याची महाविकास आघाडीला विनंती आहे. आमची स्टार प्रचारक जनताच आहे, असेही बावनकुळे म्हणाले.