अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा ः 3 जिल्हय़ांमधून दहशतीचे उच्चाटन
वृत्तसंस्था / श्रीनगर
काश्मीरचे तीन जिल्हे दहशतवाद मुक्त झाले आहेत. दहशतवादमुक्त जिल्हय़ांमध्ये बांदीपोरा, कुपवाडा आणि गांदरबल यांचा समावेश आहे. दोन वर्षांमध्ये काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन होणार असल्याचे काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी म्हटले आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांचे अनेक कमांडर मागील काही चकमकींमध्ये मारले गेले आहेत, यामुळे काश्मीर खोऱयात दोन्ही संघटनांच्या कारवायांचे नेतृत्व करणारा कुणीच शिल्लक राहिलेला नाही असे त्यांनी सांगितले आले.
बांदीपोरा, कुपवाडा अन् गांदरबल या जिल्हय़ांमध्ये अद्याप 7 विदेशी दहशतवादी कार्यरत आहेत. काश्मीरच्या 13 जिल्हय़ांमध्ये अद्याप 81 दहशतवादी सक्रीय असून यातील 29 स्थानिक तर 52 विदेशी (पाकिस्तानी) दहशतवादी असल्याचे विजय कुमार यांनी सांगितले आहे.
आता केवळ 3 टॉप कमांडर
दोन वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचे सुमारे 80 टॉप कमांडर्स होते. सद्यकाळात हिजबुल मुजाहिदीनचा फारुक नल्ली 2015 नंतर पासून एकमात्र सक्रीय कमांडर आहे. तसेच तो देखील सैन्याच्या रडारवर आहे. नल्ली व्यतिरिक्त आणखी दोन कमांडर सक्रीय आहेत. यंदा काश्मीरमध्ये एकूण 169 दहशतवादी (127 स्थानिक तर 42 विदेश दहशतवादी) मारले गेल्याची माहिती विजय कुमार यांनी दिली आहे. पूर्वी काश्मीरमध्ये 15-18 हायब्रिड दहशतवादी सक्रीय होते. आता देखील बहुतांश हायब्रिड दहशतवादी पुलवामा, शोपियां, कुलगाम, अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरमध्ये आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी चालू वर्षात 119 दहशतवादी मॉडय़ूल्सचा भांडाफोड केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनेकांचे मतपरिवर्तन
काश्मीरमध्ये तुर्कियेतून येणारी शस्त्रास्त्रs, ओव्हरग्राउंड महिला दहशतवादी अन् दहशतवादी होण्याच्या वाटेवर असलेले कट्टरपंथी याबद्दल पोलिसांना चिंता आहे. पोलिसांना यातील 13 जणांचे मतपरिवर्तन करत मुख्य प्रवाहात आणण्यास यश मिळाले आहे. पोलिसांनी याला दहशतवादाची चौथी वर्गवारी संभाव्य दहशतवादी ठरविले आहे.
नव्या दहशतवाद्यांच्या भरतीची आकडेवारी
साल नवे दहशतवादी
2022 99
2021 136
2020 167
2019 140
2018 201
2017 147
2016 95
चालू वर्षात खोऱयात झालेले बदल
चालू वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 29 नागरिक मारले गेले आहेत. यातील 3 जण काश्मिरी पंडित तर 15 काश्मिरी मुस्लीम सामील होते. चालू वर्षात काश्मीरमध्ये कुठलाच मोठा बंद झालेला नाही. इंटरनेट शटडाउन, दगडफेकीच्या घटना आणि चकमकींदरम्यान नागरिकांचा मृत्यू देखील झालेला नाही. तर चालू वर्षात काश्मीरमध्ये 99 लोक दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत. मागील 7 वर्षांमध्ये हा सर्वात कमी आकडा ठरला आहे. यातील 64 जण मारले गेले असून 17 जणांना अटक करण्यात आली आहे. सैन्य आणि पोलीस नव्या दहशतवाद्यांची संख्या 50 पेक्षा कमी करण्यासाठी काम करत आहे. पुढील दोन वर्षांमध्ये काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन होईल अशी अपेक्षा असल्याचे विजय कुमार यांनी म्हटले आहे.