प्रतिनिधी / धामणे : भागातून दररोज शेकडो विद्यार्थी शहरात शाळा कॉलेजसाठी येतात. बेळगांव सीबीटी पासून दहा किलो मीटर अंतरावर असलेल्या धामणे, देवगणहट्टी, मासगडहड्डी, कुरबरहट्टी येथील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजच्या वेळेत जाणेसाठी आणि सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी येण्यासाठी अपुऱ्या बससेवेमुळे होणारे विद्यार्थांचे हाल होत आहेत.
धामणे ग्राम पंचायतने बससेवा अधिकाऱ्याना गेल्या जुन महिन्यात निवेदन देवून शाळा कॉलेजच्या वेळेत जादा बस सोडून होणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी विनंती करुन लेखी निवेदन दिले होते. परंतु गेल्या तीन महिन्या पासून बससेवा अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. परंतु शाळेला जातेवेळी आणि येतेवेळी बसला विद्यार्थ्यांची गर्दी होवून विद्यार्थी बसबरोबर फरफटत जात आहेत. त्यामुळे कांही अपघात घडल्यास याला जबाबदार बससेवा वरिष्ठ अधिकारी राहणार आहेत का ? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकाकडून विचारण्यात येत असून कांही अनर्थ घटण्यापूर्वी तातडीने विद्यार्थ्यासाठी सकाळी आणि सायंकाळी जादा बसफेऱ्यांची सोय करावी अशी मागणी धामणे ग्राम पंचायत आणि पालक व विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे.