व्हर्च्युअल बैठकीत चर्चा : अधिकृत घोषणा बाकी : समन्वयक होण्यास नितीशकुमारांचा नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची व्हर्च्युअल बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना अध्यक्ष बनवण्यावर एकमत झाले. अशा स्थितीत आता इंडिया ब्लॉकची कमान खर्गे यांच्या हाती राहणार हे निश्चित मानले जात आहे. अध्यक्षपदावरील नियुक्तीबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना समन्वयक बनवण्याची चर्चा होती. मात्र, नितीशकुमार यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला. ‘मला कोणत्याही पदाची इच्छा नाही’, असे सांगत त्यांनी समन्वयक होण्यास नकार दर्शवला.
विरोधी गटाच्या बैठकीत जागावाटपापूर्वी अध्यक्षपदाच्या नावावर एकमत झाले. त्याचबरोबर समन्वयक नियुक्त न करण्याचे मान्य करण्यात आले आहे. ‘इंडिया’ आघाडीने आभासी बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आघाडीच्या नेतृत्त्वपदाची धुरा सोपविण्याबाबत चर्चा केली. यासंबंधीची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आभासी माध्यमातून भेटून आघाडीच्या विविध पैलूंवर आणि एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. घटक पक्षांमधील संवादाचा अभाव संपवणे हा या बैठकीचा उद्देश असल्याचे इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच रविवारपासून सुरू होणाऱ्या राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी काँग्रेसने बैठकीला उपस्थित पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचे बोलले जात आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी), उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (युबीटी) आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी 28 विरोधी पक्ष इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) च्या बॅनरखाली एकत्र आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्गे यांना ‘इंडिया’चे अध्यक्ष करण्यावर एकमत झाले आहे. नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांना विरोधी आघाडीचे समन्वयक बनविण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु त्यांनी व्हर्च्युअल बैठकीत समन्वयकपद स्विकारण्याबाबत नकार दर्शवल्याची माहिती देण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सर्वोच्च पदाचे दुसरे दावेदार होते. मात्र, सभेत नितीशकुमार यांनीच काँग्रेसमधून कोणीतरी कमांड हाती घ्यावी, असे सांगितले.
‘इंडिया’ आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा खर्गे यांच्या खांद्यावर दिल्यास ते विरोधी गटाचा चेहरा म्हणून एनडीएसमोर असतील. अशा स्थितीत खर्गे यांना प्रादेशिक पक्षांसोबत जागावाटपाचे महत्त्वाचे आव्हान पेलावे लागणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी आघाडीने अद्याप कोणतीही जागावाटपाची योजना आणलेली नाही. त्यामुळे पक्षहिताबरोबरच आघाडी एकसंध ठेवण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागणार आहे.
उद्धव, ममता, अखिलेश अनुपस्थित
‘इंडिया’च्या शनिवारच्या बैठकीला नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार, स्टॅलिन यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. मात्र ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरे हे पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे हजर राहिले नाहीत. या बैठकीपासून बड्या नेत्यांच्या अंतरामुळे आघाडीच्या ऐक्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘इंडिया’ आघाडीने सध्या अध्यक्ष किंवा समन्वयकपदाचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. शनिवारच्या बैठकीत खर्गे यांना अध्यक्ष करण्यावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. मात्र ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे कोणतीही अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही. काही पक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नसल्यामुळे त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.