सीईसी बैठकीत ठराव : राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा फैसला प्रलंबित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच काँग्रेस निवडणूक समितीची (सीईसी) शनिवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवार करण्याचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोडण्यात आला आहे. समितीने हा प्रस्ताव निवडणूक समितीकडे पाठवला होता. यानंतर निवडणूक समितीने अंतिम निर्णय गांधी कुटुंबावर सोपवला आहे. काँग्रेस या दोन्ही लोकप्रिय जागांवर उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करू शकते.
दिल्लीत शनिवारी झालेल्या सीईसी बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर चर्चा झाली. यासोबतच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेली लोकसभेच्या उमेदवारीचीही चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेशातील या हॉट सीटवरील उमेदवारांची नावे काँग्रेसने अद्याप जाहीर केलेली नाहीत. या बैठकीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवार बनवण्याची विनंती करण्यात आली आहे. यासोबतच सीईसीचे सदस्य आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस आणि विधीमंडळ पक्षाचे नेते यांनीही राहुल आणि प्रियांका यांनाच उमेदवारी देण्याचा आग्रह व्यक्त केला. पक्षाने आपल्या बालेकिल्ल्यातील उमेदवारांच्या नावांवर आतापर्यंत मौन बाळगण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, आता याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे घेणार आहेत. आता या दोन जागांवर कोणाला उमेदवारी मिळते हे पाहायचे आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ व्यक्त केली जात होती. मात्र याबाबत पक्षाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शनिवारी झालेल्या बैठकीत सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, प्रताप सिंग बाजवा यांच्यासह आणि पक्षाचे इतर बडे नेते सहभागी झाले होते.