प्रतिनिधी,विटा
स्वच्छतेत एक नंबर मिळविलेले शहर हेच का?असा प्रश्न पडावा,अशी स्थिती निर्माण झाली आहे.विविध नाल्यांचे सुशोभिकरण करण्यात आले होते.त्यात आज गवत आणि झुडुपांनी नाले दिसायचे आणि पाणी वाहुन जायचे बंद झाले आहेत,अशी टिका माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर यांनी केली आहे.
विटा शहरात गेल्या जवळपास दीड वर्षापासून प्रशासक राज आहे.मात्र याच दरम्यान, नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर यांनी केला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या,वाढलेले गवत,डासांचे प्रमाण याकडे तारळेकर यांनी लक्ष वेधत प्रशासनावर टिकास्त्र सोडले आहे.
याबाबत तारळेकर म्हणाले, शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गेल्या महिन्याभरापासून भटक्या आणि बेवारस कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.याबाबत मुख्याधिकारी,उपमुख्याधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.पादचारी आणि वाहनधारकांना कुत्र्यांचा त्रास होत आहे.पालिकेत सध्या कौन्सीलची मुदत संपलेली असल्याने प्रशासनाचा कारभार सुरू आहे.सगळे बाहेरचे अधिकारी आहेत. त्यामुळे कोणालाच काही पडलेले नसल्याने शहरात विविध प्रश्न गंभीर होऊ लागले आहेत,अशी टिकाही त्यांनी केली.
शहरात भटकी कुत्री आणि जनावरांच्या मुक्त वावराने जनजीवन विस्कळीत होऊ पहात असताना या ठिकाणचे प्रशासन सुस्तपणे फक्त बघ्याची भुमिका घेत असल्याचे चित्र आहे.प्रशासनास विचारले असता सांगलीची डॉग व्हॅन मागविली असल्याचे छापील उत्तर गेल्या महिन्यापासून मिळत आहे.याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून शहरातील विविध प्रश्नी बैठक बोलावणे आवश्यक आहे.अन्यथा विटेकरांचा उद्रेक होईल,असा इशाराही दिला.