ऑनलाईन टीम / मुंबई :
राणा दाम्पत्याला भेटून खार पोलीस स्टेशनबाहेर पडल्यानंतर माझ्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. यात गाडीची काच फुटून मला किरकोळ जखम झाली. शिवसैनिकांनी मारलेला दगड हनुवटीऐवजी थोडा वर डोळ्याला लागला असता तर मी आंधळा झालो असतो. सुदैवाने मी थोडक्यात बचावलो. हा भ्याड हल्ला ठाकरे सरकारने पोलीस आयुक्त संजय पांडे (cp sanjay pande) यांच्याकरवी घडवून आणला. माझा मनसुख हिरेन करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. ते म्हणाले, काल रात्री माझ्यावर खार पोलीस स्टेशन परिसरात जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता. उद्धव ठाकरेंच्या निर्देशाखाली संजय पांडे यांनी हा हल्ला घडवून आणला. मी पोलीस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजता येणार असल्याचे अगोदरच कळवले होते. त्यानुसार शिवसेनेचे 70 ते 80 गुंड अगोदरच पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. काहीजण पोलीस स्टेशनच्या आवारात उभे होते. आतमध्ये जातानाही त्यांनी मला शिवीगाळ केली. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असे पोलिसांना सांगितले होते. त्यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना आम्ही दूर नेले आहे, सगळी चोख व्यवस्था केली आहे, असे सांगितले. मात्र, पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच शिवसैनिकांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. मोदीजी आणि देवाच्या कृपेमुळे आज मी बचावलो आहे. गाडीची काच फुटल्याने मला दुखापत झाली.
माफीयांसारखा पोलिसांचा उपयोग करायचा आणि मनसुख हिरेनसारखी अवस्था सोमय्याची करायची असा कट ठाकरे सरकारने केला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या सांगण्यावरुन माझ्या नावाने चुकीचा एफआयआर नोंदवला गेला. एफआयआरवर सही करण्यास मी नकार देताच मला पोलिसांनी धमकावलं. सकाळीच भारत सरकारच्या कॅबिनेट सेक्रेटरींसोबत चर्चा केली. त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे. उद्या भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे, असेही सोमय्या म्हणाले.