पुणे / प्रतिनिधी :
खासदार संजय राऊत यांनी राज्यात दंगे सुरू होणार असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल झाली असून, हेच ते दंगे आहेत का, असा सवाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. महागाईला भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा निष्कर्षही त्यांनी या वेळी मांडला.
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. या वेळी खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीसंदर्भात सोमय्या यांनी भाष्य केले. ते म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी मध्यंतरी दंगलीसंदर्भात वक्तव्य केले होते. राज्यात दंगे सुरू होतील, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे दंगे झाल्याची माहिती समोर आली आहे. राऊत म्हणतात, ते हेच दंगे आहेत काय, असा प्रश्न आता निर्माण होतो.
सोमय्या पुढे म्हणाले, वाढत्या महागाईबाबत केंद्र सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ रोखण्यातही आपण यश मिळविले आहे. युक्रेन युद्धाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य नियोजन करून रशियासोबत करार केला. त्यावेळी पाकिस्तान, श्रीलंका या देशात प्रचंड भाववाढ झाली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियासोबत करार केल्यामुळेच आपण भाववाढ नियंत्रणात ठेवू शकलो. भ्रष्टाचार ही एक मोठी समस्या असून, महागाईला भ्रष्टाचारही कारणीभूत आहे.
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊनही चर्चा केली. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, माझ्यावर हल्ला करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गुंडावर लवकरच कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. आरोपींविरोधात तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. मात्र, सध्याचे आयुक्त रितेश कुमार यांच्या माध्यमातून तपासाला गती प्राप्त झाली असून, भविष्यामध्ये माझ्यावर हल्ला करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या 33 गुंडावर निश्चित कारवाई होणार आहे. तसेच तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे शरद पवार यांच्या घरातील होते. अमिताभ गुप्ता यांनीच कोरोना काळात राजेश वाधवान याला पळून जाण्यास मदत केली होती आणि त्यांच्याच देखरेखीत माझ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोपदेखील त्यांनी या वेळी केला.
जनसंघातील शेवटची पिढी संपुष्टात
बापट यांच्या जाण्याने भारतीय जनसंघामधील शेवटची पिढी संपुष्टात आली आहे, असे म्हणावे लागेल. भाजपातील नवीन पिढीने खासदार गिरीश बापट यांच्याकडून आदर्श राजकीय नेतृत्व कसे करता येते, हे शिकावे. पुणे शहरात महापौर निवडून येईल, राज्यात सत्ता येईल. असे कधीही वाटत नसताना त्यांनी कामास सुरूवात केली. पुण्याच्या विकासात बापट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
कोणाचाही तपास बंद झालेला नाही
भावना गवळी शिंदे गटात आल्यावर ईडीमार्फत सुरू असलेली चौकशी बंद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले, की ही बाब न्यायप्रविष्ट असून त्यावर बोलणे उचित नाही. पण कोणाचीही चौकशी किंवा तपास बंद झालेला नाही. तपास हा यंत्रणांमार्फत सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले.