विक्रम किर्लोस्कर यांची माहितीः कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा उद्देश
वृत्तसंस्था / मुंबई
टोयोटा किर्लोस्कर मोटर संपूर्ण कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने हायब्रिड वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे, तर भविष्यात देशात इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) सादर करण्याची त्यांची योजना असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी दिली आहे. यावेळी कंपनीने शुक्रवारी आपल्या लोकप्रिय बहुउद्देशीय वाहन इनोव्हा ‘इनोव्हा हिक्रॉस’ ची नवीन हायब्रिड आवृत्ती लॉन्च केली आहे.
विक्रम किर्लोस्कर यांना विचारण्यात आले, की टोयोटा किर्लोस्कर मोटारची रणनीती भारतात इलेक्ट्रिक वाहने वाढत असताना हायब्रिड वाहनांवर लक्ष केंद्रित करण्याचे का आहे? यावर बोलताना ते म्हणाले ‘कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा उद्देश आहे. तुम्हाला त्याकडे सर्वांगीण आणि वैज्ञानिकदृष्टय़ा पहावे लागेल आणि आम्ही तेच करत आहोत.’
उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय
भारतातील अक्षय ऊर्जा स्रोतांची सध्याची निम्न पातळी लक्षात घेता, असे म्हणता येईल की कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट इलेक्ट्रिक वाहने पूर्ण करू शकतील असे नाही. मात्र भारतात नूतनीकरणक्षम वीज 50-60 टक्क्यांहून अधिक वाढू लागेल. ती नक्कीच सर्व विजेवर आधारित असेल. आम्ही इलेक्ट्रिक वाहनेही सादर करू शकतो, असेही किर्लोस्कर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सरकारच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबर 2022 पर्यंत भारताच्या स्थापित वीज निर्मिती क्षमतेच्या 57.9 टक्के जीवाश्म इंधन आणि 42.1 टक्के इतका आकडा हा बिगर जीवाश्म इंधने याचा राहणार आहे.