रोहित-गिल यांची अर्धशतकांसह शतकी भागीदारी, उमरानचे 3 बळी
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
विराट कोहलीचे शतक, रोहित शर्मा, शुबमन गिल यांची अर्धशतके आणि उमरान मलिक, सिराज यांच्या भेदक माऱयाच्या बळावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात लंकेचा 67 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीला सामनावीराचा बहुमान मिळाला. लंकेचा कर्णधार दसुन शनाकाचे झुंजार नाबाद शतक व पथुम निसांका यांची अर्धशतके मात्र वाया गेली.
दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ उठवत स्टार फलंदाज विराट कोहलीने नव्या वर्षाची सुरुवात 45 व्या वनडे शतकाने करताना 113 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, त्याचा सलामीचा साथीदार शुबमन गिल यांनी अर्धशतके नेंदवल्यामुळे भारताने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 373 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर लंकेला 50 षटकांत 8 बाद 306 धावांवर रोखत शानदार विजय साकार केला. लंकेचा सलामीवीर निसांका (72) व कर्णधार शनाका (88 चेंडूत 12 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 108) व काही प्रमाणात धनंयज डिसिल्वा (47) वगळता इतरांना फारसे योगदान देता आले नाही. शनाकाने जिगरबाज शतक नोंदवताना नवव्या गडय़ासाठी रजितासमवेत अभेद्य 100 धावांची भागीदारी केली. त्यात रजिताचा वाटा 9 धावांचा होता. भारताच्या उमरान मलिकने 3, सिराजने 2, चहल, हार्दिक व शमी यांनी एकेक बळी मिळविला. दुसरा सामना गुरुवारी 12 रोजी कोलकात्यात होणार आहे.
शेवटच्या षटकात शनाका नॉनस्ट्रायकर एंडला वारंवार पुढे जात असल्याचे पाहून शमीने त्याला धावचीत केले. पण कर्णधार रोहितने ते अपील मागे घेतल्याने शनाकाला या षटकात शतक पूर्ण करता आले.
कोहलीचे शतक
बांगलादेशविरुद्ध झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यात कोहलीने 113 धावा जमविल्या होत्या, येथील सामन्यातही त्याने हाच जोम कायम राखत 87 चेंडूत 113 धावा फटकावत 73 वे आंतरराष्ट्रीय शतक नोंदवले. आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवून देताना त्याने आपल्या खेळीत 12 चौकार व एक षटकार मारला. मधल्या षटकात दुसऱया बाजूने ठरावीक अंतराने विकेट पडत असताना त्याने एक बाजू लावून धरत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. चार वर्षापूर्वी या मैदानावर एकमेव वनडे सामना झाला होता. विंडीजविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात कोहलीने 140 धावा फटकाल्या होत्या. येथील खेळीत मात्र त्याला नशिबाची चांगली साथ मिळाली. 52 व 81 धावांवर असताना त्याला दोन जीवदाने मिळाली. वनडेमध्ये त्याची 45 शतके झाली असून तो आता सचिन तेंडुलकरपेक्षा फक्त चार शतकांनी मागे आहे. सचिनने वनडेमध्ये सर्वाधिक 49 शतके नोंदवण्याचा विक्रम केला आहे. कसोटीमध्ये कोहलीने 27 व टी-20 मध्ये एक शतक नोंदवले आहे.
या सामन्यात इशान किशन व सूर्यकुमार यादव या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना वगळल्यानंतर कर्णधार रोहितवर टीका होऊ लागली. इशानच्या जागी घेतलेल्या शुबमन गिलसमवेत 143 धावांची भक्कम सलामी देत या टीकेला त्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. इशानने बांगलादेशविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात 210 धावांची विक्रमी खेळी केली होती, त्यामुळे रोहितवर त्याला वगळल्यामुळे टीका होत होती. मात्र त्याचा निर्णय सार्थ असल्याचेच नंतर दिसून आले. रोहितने 67 चेंडूत 83 धावा फटकावताना 9 चौकार, 3 षटकार मारले. पाटा खेळपट्टीवर त्याने लंकेच्या वेगवान गोलदांजांनाही पुढे सरसावत सहजतेने फटके लगावले. त्याने 41 चेंडूतच अर्धशतक गाठले. त्याचा जोडीदार गिलनेही सफाईदार फटके लगावत शानदार अर्धशतक नोंदवले. मागील वनडे मालिकेतील फॉर्म कायम राखत त्याने 51 चेंडूत पाचवे वनडे अर्धशतक पूर्ण केले. दसुन शनाकाने त्याला बाद करीत ही जोडी फोडली. त्यावेळी गिलने 60 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 70 धावा फटकावल्या होत्या. आडवा फटका मारताना तो पायचीत झाला.
शतकांच्या दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असणारा रोहितही 30 धावांची भर पडल्यानंतर बाद झाला. पदार्पणवीर दिलशान मधुशन्काने त्याला त्रिफळाचीत केले. यावेळी भारताची स्थिती 24 व्या षटकात 2 बाद 173 अशी होती. मात्र ही जोडी बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी झाल्याने लंकन गोलंदाजांना थोडे हायसे वाटले. मात्र सावध सुरुवात करून स्थिरावल्यानंतर कोहली व श्रेयस अय्यर यांनी मग धावांचा वेग वाढवला. सूर्यकुमारऐवजी पसंती दिलेला श्रेयस अय्यर सफाईदारपणे खेळत होता. त्याने हसरंगाला एक षटकारही मारला. पण स्थिरावल्यानंतरही त्याला मोठी खेळी करता आली नाही. धनंजय डिसिल्वाने त्याला 28 धावांवर बाद केले. 24 चेंडूत त्याने 3 चौकार, 1 षटकार मारला. अलीकडे टीकेचे लक्ष्य बनलेला केएल राहुल स्थिर होऊनही मोठी खेळी करू शकला नाही. 29 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 39 धावा फटकावत तो रजिताच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. हार्दिकने 12 चेंडूत 14, अक्षर पटेलने 9, शमीने नाबाद 4, सिराजने नाबाद 7 धावा जमविल्या. लंकेच्या कसुन रजिताने 88 धावांत 3 बळी मिळविले तर मधुशन्का, करुणारत्ने, शनाका, डीसिल्वा यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः भारत 50 षटकांत 7 बाद 373 ः रोहित शर्मा 83 (67 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार), गिल 70 (60 चेंडूत 11 चौकार), कोहली 113 (87 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), श्रेयस 28 (24 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), राहुल 39 (29 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा 14 (12 चेंडूत 1 षटकार), पटेल 9, शमी नाबाद 4, सिराज नाबाद 7, अवांतर 6. गोलंदाजी ः रजिता 3-88, मधुशन्का 1-43, करुणारत्ने 1-54, शनाका 1-22, डीसिल्वा 1-33).
लंका 50 षटकांत 8 बाद 306 ः निसांका 72 (80 चेंडूत 11 चौकार), असालंका 23 (28 चेंडूत 3 चौकार), धनंजय डिसिल्वा 47 (40 चेंडूत 9 चौकार), शनाका नाबाद 108 (88 चेंडूत 12 चौकार, 3 षटकार), करुणारत्ने 14, अवांतर 12. गोलंदाजी ः उमरान मलिक 3-57, सिराज 2-30, हार्दिक 1-33, चहल 1-58, शमी 1-67.
रोहित शर्माच्या 9500 धावा
नव्या वर्षाची सुरुवात शानदार अर्धशतकाने करणाऱया रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये 9500 धावांचा टप्पा या सामन्यात पूर्ण केला. हा टप्पा गाठणारा तो भारताचा सहावा फलंदाज आहे. याआधी सचिन तेंडुलकर (18426), कोहली (12584), गांगुली (11221), द्रविड (10768), धोनी (10599) यांनी हा पराक्रम केला आहे. रोहितच्या आता 236 सामन्यांतील 229 डावांत 9537 धावा झाल्या आहेत. 48.90 ही त्याची सरासरी असून 29 शतके व 47 अर्धशतकांचा त्यात समावेश आहे. 264 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 2012 नंतर प्रथमच रोहितला मागील वर्षी एकही आंतरराष्ट्रीय शतक नोंदवता आले नाही.