राबलेल्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक निवडीतून वगळले; नाराज कार्यकर्त्यांतून तीव्र संताप
सर्व तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज ?आजऱ्यातील लोण जिल्हाभर पसरण्याची शक्यता
कृष्णात चौगले कोल्हापूर
भाजप सत्तेत नसल्यापासून आजतागायत गेली अनेक वर्षे पक्षासाठी तळमळीने राबलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नुकत्याच झालेल्या संघटनात्मक निवडीमध्ये डावलले आहे. अडचणीच्या काळात ज्यांनी संघटनेची धुरा सांभाळली त्यांना पक्षाच्या सुवर्णकाळात कात्रजचा घाट दाखवला आहे. बारा तालुक्यांच्या अध्यक्ष निवडीसह पक्षांतर्गत विविध आघाड्यांच्या नियुक्तीमध्ये संघटना वाढीसाठी राबलेल्यांना सोयीस्कररित्या बाजूला केले आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा नेतृत्वाकडून आजरा तालुक्यातून नाराजीची भूमिका जाहीर करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याऐवजी त्यांना पक्षातूनच ‘आऊट’ केले असल्याचा आरोप आहे. यापुढे जिह्यातून कोणी अशी उघडपणे नाराजी व्यक्त करू नये असा संदेश देण्यासाठी ही ‘अॅक्शन’ घेतली असली तरी यातून पक्षाच्या बिनीच्या शिलेदारांना मात्र भाजप मुकणार आहे.
ज्या पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत तो पक्ष अधिक ताकदवान समजला जातो. त्यामुळे बदलत्या राजकीय घडामोडी आणि प्रचार पद्धतीमध्ये झालेले बदल लक्षात घेऊन भाजपच्या संघटनात्मक रचनेमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या कोल्हापूरातील दौऱ्यामध्ये अनेक बदल सुचवून त्याप्रमाणे कार्यप्रणाली राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संघटनात्मक बांधणीमध्ये विशेषत: युवकांना संधी देण्याचे निश्चित झाले. 2024 मधील लोकसभा, विधानसभा निवडणुकीबरोबरच आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यश संपादन करण्यासाठी भाजपने संघटनात्मक बांधणीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सद्यस्थितीत बुथ बांधणीचे काम युद्धपातळीवर सुऊ असून सर्वसामान्य जनतेला पक्षाशी जोडले जात आहे. ‘गाव तेथे बुथ’ आणि ‘घर तिथे कार्यकर्ता’ ही संकल्पना भाजपकडून प्रभावीपणे राबविली जात आहे. पण तालुका व आघाडी पातळीवरील निवडीमध्ये आघाडीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच ‘नारळ’ दिल्यामुळे संघटनात्मक बांधणीच्या कामाची गती मंदावण्याची शक्यता आहे.
आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून रहायचे काय ?
ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचा मेळ घालून पक्षाचे काम सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवा अशा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या स्पष्ट सूचना आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांची सोडवणूक कशी करता येईल ? याची जबाबदारी युवकांकडे दिली आहे. थेट तळागाळातील जनतेशी नाळ जोडून त्यांच्यापर्यंत मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राबविलेल्या योजना सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. आणि त्यांच्याकडून ती चोखपणे निभावली जात आहे. पण अशा तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच जिल्हा नेतृत्वाकडून बळ दिले जात नसल्यामुळे संघटनेची वाटचाल विकलांगतेच्या दिशेन सुरु आहे. संघटनात्मक पातळीवर गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडीतून जिह्यातील शेकडो कार्यकर्ते नाराज झाले असून आयुष्यभर आम्ही कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे काय ? संघटनेतील प्रमुख पद कधी मिळणार ? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
राबलेल्या पदाधिकाऱ्याला न्याय कधी मिळणार ?
पक्षाचा एखादा कार्यक्रम असला की कार्यालयामध्ये येणारे पाच-पन्नास कार्यकर्ते म्हणजे पक्ष नव्हे. तर जिह्यातील प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक वॉर्डात आणि घराघरात आपला कार्यकर्ता असावा यासाठी भाजपचे अनेक कार्यकर्ते निस्वार्थीपणे राबत आहेत. पण त्यांना प्रशासकीय पातळीवर लाभाचे पद राहूद्या, किमान संघटनेतील पद देऊन त्यांना बळ द्यावे अशी जुन्या कार्यकर्त्याची भावना आहे. पण जिल्हा कार्यकारिणीसह तालुकाध्यक्ष व आघाडी अध्यक्षांची निवड करताना जो अर्थिक सक्षम त्यालाच पद असे धोरण राबविले असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. बुथ पातळीवर राबण्यासाठी अथवा सभा, मेळावे, आंदोलनासाठी जुन्या कार्यकर्त्यांचा वापर आणि पदावर मात्र प्रत्यक्ष नेत्यांच्या बगलबच्च्यांना संधी देण्याची भूमिका जिल्हा नेतृत्वाने घेतली असल्याची सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आहे.
आमची व्यथा मांडायची कोणाकडे ?
आजरा तालुक्यता भाजपच्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिसरी पीढी जनसंघाच्या काळापासून आजपर्यंत कार्यरत आहे. पडत्या काळात काँग्रेसच्या मात्तबर विरोधकांना तोंड देत पक्षाचा विचार रूजवत कोणताही गट तट न स्थापन करता केवळ पक्ष हाच आमचा विचार अशी भूमिका घेऊन प्रामाणिक काम केले. अशा परिस्थितीत 2014 व 2019 मध्ये पक्षाची केंद्रात आणि राज्यात सत्ता आली. पण दुर्देवाने जिह्यातील नेत्यांना जिह्यात सत्ता टिकविता आली नाही. आपल्याच कार्यकर्त्यांचे खच्चिकरण करण्यामध्ये नेते मश्गूल झाले. शासकीय पदाच्या निवडीतही कधीही विश्वासात न घेता विरोधकांना झूकते माप दिले. केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील तालुक्यातील विकासकामे किंवा कार्यकर्त्यांची कामे करू शकत नाही. आम्ही ज्या विचाराने पक्षाशी जोडले गेलो तो विचार सध्या कोणत्याही नेत्याकडे दिसत नाही. त्यामुळे अशा लोकांबरोबर काम करणे शक्य नसून आमची व्यथा मांडायची कोणाकडे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुधीर कुंभार- भाजप कार्यकर्ता, आजरा