कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे. आज साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच बाहेर पडले आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बांधाऱ्याची पातळी 28.3 फुटांवर आहे. कासारी नदीने ही पात्र ओलांडले असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीने जिल्ह्यातील तीन जिल्हा मार्ग आणि दोन राज्यमार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून हवामान खात्याने उद्या पुन्हा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवारी देखील कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे सूचना नागरिकांना दिले आहेत.