गाडीतील पती-पत्नी सुदैवाने बचावले
कार्वे /वार्ताहर
मजरे कार्वे येथील होनहाळ नाल्यात चार चाकी घसरून पाण्यातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने पती-पत्नी बचावले. याबाबत असे समजते की, मुरकुटेवाडी येथील कल्लाप्पा वैजू बाणेकर व त्यांची पत्नी हे दोघे बेळगावहून लग्नकार्य आटोपून परत गावी येत होते. यशवंतनगरच्या पुढच्या बाजूस आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घसरून सरळ नदीत गेली. गाडी नदीत जात असताना आडव्या आलेल्या झाडाला धडकली व गाडी जाग्यावरच फिरली.
यादरम्यान कल्लाप्पा बाणेकर यांनी गाडीतून बाहेर येऊन त्यानंतर आपल्या पत्नीला गाडीच्या बाहेर काढले. यावेळी तिथून जाणाऱ्या तडशीनहाळ येथील रामलिंग गुरव यांनी प्रसंगावधान राखून या दोघांनाही बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले. केवळ दैव बलवत्तर म्हणून गाडी वाहून गेली असताना सुद्धा या दोघा पती-पत्नीचे प्राण वाचले आहेत.
हे ही वाचा : रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहन थेट दुधगंगा नदीत
कल्लाप्पा बाणेकर हे शिनोळी येथील ऍटलास कंपनीत नोकरीस आहेत. तीन-चार वर्षांपूर्वीच त्यांनी मारुती सुझुकी कंपनीची गाडी (MH09 FQ 66 19) घेतली होती. त्या गाडीतून आज हे पती-पत्नी प्रवास करत होते. मात्र दुचाकी स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी नदीत बुडाली आहे. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान या परिसरात प्रचंड पाऊस सुरू असून या नदीच्या काटाबरोबर पाणी भरून वाहत आहे. येथील नागरिकांनी गाडी काढण्यासाठी प्रयत्न केले. पण पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गाडी बाहेर काढण्यात अडथळा येत आहे.