अयोध्या दौरा राष्ट्रीय प्रश्न नाही, राज ठाकरे यांची उडवली खिल्ली
कोल्हापूर प्रतिनिधी
निवडणुकांमध्ये लढण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. पक्षातील काही जणांचा स्वतंत्रपणे लढावे असा आग्रह आहे, तर काही जणांना काँग्रेस, शिवसेनेबरोबर आघाडी करून लढावे, असे वाटते. त्यामुळे पक्षातील दोन्ही मतप्रवाहाचा विचार करून आगामी काळात पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
बेळगावला रवाना होण्यापूर्वी मंगळवारी सकाळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱयाची खिल्ली उडविली. ठाकरे यांचे नाव न घेता पवार म्हणाले, अयोध्या दौरा काही राष्ट्रीय प्रश्न नाही.
पवार यांनी या पत्रकार परिषेदत विविध प्रश्नांवर भाष्य केले. राजद्रोहाच्या कायद्याविषयी पवार म्हणाले, 1890 मध्ये इंग्रजांनी हे कलम आणले. पूर्वी राजाविरोधात, राजसत्तेविरोधात आवाज उठविण्यावर राजद्रोहाच्या कलमाचा वापर केला जात असते. आज आपण लोकशाहीत आहोत. लोकशाहीत नागरिकांना सत्तेविरोधात बोलण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. त्यामुळे राजद्रोहाचे कलम कालबाहय़ झाल्याची भूमिका मी यापूर्वीच मांडली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केल्यानंतर केंद्र सरकार या कायद्याबाबत फेरविचार करणार असेल तर ती चांगली बाब आहे, असे पवार म्हणाले.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयावर भाष्य करताना पवार म्हणाले, अयोध्या दौरा राष्ट्रीय प्रश्न नाही. ते अयोध्येला जाणार आहे की नाही हे माहित नाही पण आज देशात ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे, इंधनाचे दर वाढत आहेत. बेरोजगारीतही वाढ होत आहे, या विषयी केंद्रातील सत्ताधारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. ते जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. अशावेळी काही जण धार्मिक मुद्दे पुढे रेटून महागाई, बेरोजगारीवरील लक्ष विचलित करत आहेत, अशा शब्दात पवार यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाचा समाचार घेतला.
सर्वोच्च न्यायालयाने पंधरा दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले नाहीत. पंधरा दिवसांत निवडणूक प्रक्रियाला सुरूवात करण्यास सांगितले असल्याचे पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
कोर्टाच्या लढाईत भाजप वरचढ
भाजपच्या किरीट सोमय्या यांना जामिन मिळतो, मात्र राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख, नवाब मलिक यांना जामिन मिळत नाही. कोर्टातील लढाईत भाजप हा महाविकास आघाडीपेक्षा वरचढ आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले, कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करण्यासारखे खूप आहे. पण आज जर मी बोललो तर उद्या तुम्हाला आणि मला नोटीस येईल.
संभाजीराजेंबाबत काँग्रेस, शिवसेनेची चर्चा करून निर्णय
महाराष्ट्राच्या प्रश्नावर सर्व पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत, संसदेत एकजूट दाखवावी, अशी माझी प्रारंभीपासून भूमिका राहिली आहे. संभाजीराजे राज्यसभेत होते. मी देखील राज्यसभेचा सदस्य आहे. आमच्या भूमिकेला नेहमीच संभाजीराजे यांनी साथ दिली. त्यांच्याबाबत काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट करताना संभाजीराजे यांच्याबाबत राष्ट्रवादी सकारात्मक असल्याचे संकेत दिले.