कोल्हापूर जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. ज्या लोकांना मागिल महापूराचा फटका बसला आहे त्या नागरिकांनी आज स्थलांतर होण्यासाठी तयार राहण्याच्या सुचना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी एका प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधताना केले आहे. तसेच नागरिकांनी शासनाने नियुक्त केलेल्या निवारागृहामध्ये आश्रय घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. भारतीय हवामान खात्याने सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्यानंतर पडलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूरवर पुन्हा एकदा महापूराचे सावट ओढावले आहे. प्रशासनाने संभाव्य महापूराच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला असून स्थलांतराचे काम सुरु केले आहे.
एका प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर ग्रामिण आणि शहर वासियांना स्थलांतरीत होण्यास तयार रहावे असे आवाहन केले आहे. ते म्हणाले “2019 आणि 2021 च्या पुरात राजाराम बंधाऱ्याजवळ 52 फूट पाण्याची पातळी गाठल्यावर बाधित झालेल्या प्रत्येकाने आज 25 जुलैच्या संध्याकाळपर्यंत स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे. प्रशासनाकडून सूचना मिळताच शासनाने नियुक्त केलेल्या मदत शिबिरांमध्ये किंवा निवारागृहामध्ये दाखल होण्यासाठी आपली घरे सोडावीत.”
निवारागृहात शासनाने जनवारांसाठीही सोय केली आहे, तसेच त्यांच्या चारा आणि इतर गोष्टींचीही खबरदारी घेतली असल्याने जनावारांसह नागरिकांनी आपापली घरे सोडणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून 40 फुटावरून वाहत असून ती धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत सुरु आहे. तसेच राधानगरी धरण 94.92 टक्के भरले असून त्यातून 1550 क्युसेक्स ने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पाऊस असाच लागला तर राधानगरी पाणलोट क्षेत्र तसेच धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरण कोणत्याही क्षणी भरून दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होणार आहे.