शिवसेनेचे कोल्हापूर जिह्यातील मतदार संघ : स्वाभिमानी, काँग्रेसही दावेदार
सांगली प्रतिनिधी
हातकणंगले व कोल्हापूर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीसाठी सोडवून घ्यावेत आणि हातकणंगलेमधून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस सांगली, कोल्हापूर जिह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली असून मविआच्या जागा वाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी केली. शिरूर, कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, पी आर. पाटील यांच्यासह सांगली कोल्हापूर दोन्ही जिह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय विशेषत: वाळवा, शिराळा, शिरोळ, हातकणगलेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. स्वत: शरद पवार यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा बुधवारी घेण्यात आला असून गुरुवारी हिंगोली, वर्धा, दिंडोरी, नगर, अमरावती, बीड, भिवंडी व जालना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.
राजू शेट्टींना शह?
दरम्यान, कोल्हापूर जिह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदार संघात गतवेळी शिवसेनेने विजय मिळवला होता. मात्र तेथील खासदार पक्षफुटीनंतर शिंदे गटात सामील झाले. गतवेळी स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी हे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून लढले आणि सेनेच्या धैर्यशील माने यांच्याकडून पराभूत झाले होते. सध्या माने यांना सेनेकडे सक्षम पर्याय दिसत नसल्याने लवकरच राजू शेट्टींचा स्वाभिमानीचा इंडिया आघाडीत समावेश करून त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सुटेल अशी तर सेनेत आणि काँग्रेसमध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी वाटाघाटी होतील अशी अपेक्षा होती.
दरम्यान, मध्यंतरी शेट्टी यांनी आपली स्वत:ची वेगळी आघाडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर राष्ट्रवादीने उचल खाली आहे. त्यानिमत्ताने कोल्हापूरवरही दावा केला आहे. तर ऊस आंदोलनाच्या निमित्ताने राजू शेट्टी यांनी आपला मतदार संघ पिंजून काढण्यास सुरवात करताच राष्ट्रवादीकडून त्यांना शह देणारी ही कृती करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असून आता अधिकृतरित्या पवारांना दोन्ही मतदारसंघ सोडवून घेण्याचे साकडे घालतानाच उमेदवारीचीही मागणी करण्यात आली आहे.